सध्या विश्वचषकात भारताने ५ सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून, येत्या ३० जूनला भारताचा सामना साहेबाच्या टीमशी म्हणजेच इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामान्यआधी भारतातलं राजकीय वातावरण तापले आहे. त्याचे कारण म्हणजे ३० जूनला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून खेळणार आहे. या भगव्या रंगामुळे राजकीय वातावरण तापले असून, अल्पसंख्याक आमदारांनी या जर्सीबाबत नाराजी व्यक्त केलीय. तर सत्ताधारी आमदारांनी राष्ट्रीय ध्वजातल्या भगव्या रंगावर नाराजी कसली? हा प्रश्न उपस्थित केला आहे. एकूणच भगव्या रंगाच्या जर्सीमुळे राजकीय सामना रंगलाय.
‘भारताच्या झेंड्यात हिरवा रंगही आहे’
दरम्यान, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत भगव्या रंगाचा करायचा आहे, त्याचाच हा एक भाग’, असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी म्हटले आहे. तसेच ‘भगवा रंग आपल्या झेंड्यात असला तरी त्यात हिरवा रंगही आहे’, याची आठवण आझमी यांनी करून दिली आहे. ‘मोदी यांच्या नेतृत्वात हा रंगबदल केला जातोय, खेळात राजकारण आणलं जातंय’, असं काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी म्हटलंय.
India’s new orange jersey against Afghanistan.
Isn’t it looking like IPL’s Gujarat Lions team’s jersey ?? #Worldcup #ICCWC2019 #ICCCricketWorldCup2019 pic.twitter.com/BOrYWx5WVZ
— Rj Harshil (@RjHarshil) June 20, 2019
‘खेळात धार्मिक बाबी आणणं अयोग्य’
‘भारतीय क्रिकेट टीम आपल्याला भगव्या जर्सीत खेळताना पाहायला मिळणार आहे. याचा सर्वांना आनंद झाला पाहिजे. अबू आझमी यांच्याकडे कोणताही मुद्दा नसल्याने अशा प्रकारे रंगांचे राजकारण ते करत आहेत’, असा आरोप भाजपा आमदार राम कदम यांनी केला आहे. ‘भारताच्या तिरंग्यात भगवा रंगपण आहे. पण केवळ मतांच्या राजकारणासाठी भगव्या रंगाला विरोध दर्शवला जात आहे’, असे सहकार राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाब पाटील यांनी म्हटले आहे. ‘जे लोक या रंगाला विरोध करत आहेत, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटतेय’, असेही पाटील म्हणाले. ‘खेळाचा राष्ट्रीय एकात्मतेशी संबंध जोडला जात असताना यात धार्मिक बाबी आणणं योग्य नसल्याचे’, मतही पाटील यांनी नोंदवले आहे.