‘मराठा आरक्षणासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खटले तातडीने मागे घ्या’, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वाची माहिती सभागृहास देतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाचे श्रेय लाटणाऱ्या सरकारने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे आद्याप मागे न घेतल्यामुळे सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे.’ त्याचबरोबर न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असेही वडेट्टीवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?
‘मराठा आरक्षणासाठी राज्यभरात तब्बल ५६ महामोर्चे शांततामय पध्दतीने काढण्यात आले. मात्र अहिंसक पध्दतीने मोर्चे काढणाऱ्या तरूणांवर कलम ३०७, म्हणजे हाफ मर्डर, कलम ५२४ सारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १३ हजार ६०० तरूणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व विद्यार्थी आहेत. त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व तरूणांवरील सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत’, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
‘मराठा आरक्षणासाठी झालेल्या शांततामय आंदोलनात ज्यांना जीव गमवावा लागला आणि ज्यांनी बलिदान दिले, अशा तरूणांच्या कुटूंबियांना १० लाख रूपये आणि एसटी महामंडळात नोकरी देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचे काय झाले?’, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. ‘आता त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व आश्वासने पूर्ण करावीत’, असेही वडेट्टीवार म्हणाले.