अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस) देशाची राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढणार आहे. शेतीविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. काही प्रमाणात त्या आंदोलनाला यशही आले होते. त्यामुळे आता थेट दिल्लीत मोर्चा काढून केंद्र सरकारकडे मागण्याय घेऊन देशभरातील शेतकरी जाणार आहेत. किसान सभेच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचा दिल्लीतील लाँग मार्च ५ सप्टेंबरनंतर होण्याची शक्यता आहे.
भाजप शेतकरीविरोधी पक्ष
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकार स्वतंत्र भारतातील सर्वांत शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी सरकार असल्याचे शेतकरी संघटनांनी वेळोवेळी म्हटले आहे. त्या सरकारमुळे शेतीविषयक अभूतपूर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याची परिणती लाखों कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण बेरोजगारीत वाढ आदींमध्ये झाली आहे, असा आरोप किसान सभेने केला आहे.
कर्जमाफीची एक वर्ष
गेल्या वर्षी २८ जून रोजी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती. राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या योजनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र जाहीर केलेल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ऑनलाइन पद्धतीने कर्जमाफीची योजना राबवताना अनेकदा सरकारने घोळ घातला. सरकारच्या या योजनेवर विरोधकांनीही सडकून टीका केली. सरकारच्या कर्जमाफी घोषणेनंतरही राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबले नाही. त्यातच आता शेतकरी थेट दिल्लीकडे मोर्चा वळवणार आहेत.