राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील सहा राज्यांमध्ये राज्यपाल बदलाचे आदेश दिले आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचा राज्यपाल पदाचा कार्यकाळ पुर्ण झाला असून त्यांची राज्यपाल पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यांच्या जागी मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसह आज पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, त्रिपुरा आणि नागालँड राज्यातही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल हे चार राज्य राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जातात. राष्ट्रपती भवनने माहिती दिल्यानुसार उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि नागालँड राज्यातील राज्यपालांचा कार्यकाळ पुर्ण झाला होता. तर मध्य प्रदेश आणि बिहार राज्यातील राज्यपालांना इतर राज्यात नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्य सध्याचे राज्यपाल (कार्यकाळ पूर्ण) नवे राज्यपाल
उत्तर प्रदेश राम नाईक आनंदीबेन पटेल
पश्चिम बंगाल केसरीनाथ त्रिपाठी जगदीप धनखर
त्रिपुरा कप्तान सिंह सोलंकी रमेश बैंस
नागालँड पद्मनाभ आचार्य आर. एन. रवी
राज्य सध्याचे राज्यपाल (बदली) नवे राज्यपाल
मध्य प्रदेश आनंदीबेन पटेल लालजी टंडन
बिहार लालजी टंडन फगु चौहान
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचाही कार्यकाळ ३० ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. महाराष्ट्रासोबतच गोवा, कर्नाटक, राजस्थान आणि केरळच्या राज्यपालांचा कार्यकाळ देखील येत्या काही दिवसांत संपणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांमध्येही येणाऱ्या काळात राज्यपाल बदलले जाण्याची शक्यता आहे.