जनतेचा जनादेश मिळूनही सरकार स्थापन होत नसल्याचे दु:ख व्यक्त करताना राज्यात महायुतीचे सरकार येईल की नाही यावरही शंका असल्याचे वक्तव्य महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठूमाऊलीची चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक पूजा केली. काल, गुरुवारी ते पुजेकरता पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार येणार का बाबतची शंका निर्माण झाली आहे. सध्या महायुतीत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू आहे. त्यात शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यावरही भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्यातला दुरावा हा वाढत चालला आहे.
दरम्यान, भाजपने राजकारणामध्ये टीका केली होती. पण, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही. पण, नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले जात असल्याचे सांगत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “सत्तेसाठी इतर पक्षाचे आमदार फोडण्याची भाजपची संस्कृती नाही. निवडणूकीपुर्वी जे भाजपात आले त्यांनी विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवला होता. भाजपच विकास करु शकेल असा त्यांना विश्वास असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.”
तसंच, आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने मुख्यमंत्री शपथ घेणार का? प्रश्नाचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. निसर्गाबाबत काही चुका झाल्या असल्यास विठ्ठलाने लेकरु समजून माफ करावे, अशी मागणी महापुजेवेळी श्री विठ्ठलाला केली असल्याचेही पाटील म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक उपस्थित होते.
हेही वाचा –
अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला – संजय राऊत