यंदा २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच प्रवेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानंतर राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात नाराजी उमटत आहे. मात्र यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य?, अशी टीका आशिष शेलार यांनी ट्विट करत केली आहे.
तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केल्याचे देखील शेलार ट्विटमध्ये म्हटले आहे. दरवर्षी मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जातात. यंदा मात्र सिंधुदुर्ग प्रशासनाने त्यावर निर्बंध घातले असून येत्या ७ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंतच सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ई पास देखील बंधनकारक करण्यात आला असून त्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या आधी १४ दिवस त्यांना क्वारंटाईन ठेवता येईल. त्याशिवाय येणाऱ्या चाकरमान्यांनी १४ दिवस क्वारंटाईन होण्यासाठी निवासाची व्यवस्था, तिथल्या सोयी-सुविधा यांची व्यवस्था लावूनच यायचं आहे. त्यासोबत त्यांच्या घरच्यांना देखील १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातून सिंधुदुर्गात जाणाऱ्या चाकरमान्यांना ८ तारखेपासून सिंधुदुर्गात नो एंट्री असेल, असे देखील या इतिवृत्तात म्हटले होते.
लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करु नका, तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य ?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 10, 2020
जिल्हाधिकाऱ्यांची सारवासारव –
दरम्यान, काल संध्याकाळी वृत्त प्रसारित होताच पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात सूर उमटू लागल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सारवासारव केली. गणेशोत्सवासंबंधी बैठकीचे इतिवृत्त सध्या समाज माध्यमातून फिरत आहे. सदर इतिवृत्त म्हणजे आदेश नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. या बैठकीनंतर आणखी एक बैठक झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठवून मगच अंतीम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आशा स्वरुपाचे कोणतेही वृत्त प्रकाशीत तसेच प्रसारित करू नये व लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये, असे आवहन जिल्हाधिकारी यांनी रात्री उशिरा केले.
काय होते इतिवृत्तात –
- क्वारंटाईन, ई पासचे नियम मोडणाऱ्यांना ५ हजारांचा दंड
- बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ग्राम समितीकडे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी बंधनकारत
- राजकीय पक्षांना गणेशभक्तांसाठी बस व्यवस्था करण्यावर बंदी
- गणेशोत्सव काळात खरेदीसाठी गर्दी करू नये, त्याआधीच खरेदी करण्याचं आवाहन
- गणेश मंडळांनी मूर्तीची उंची कमी ठेवावी, मिरवणुकांना बंदी
- वाड्यांमध्ये एकत्र येऊन भजन करण्यावर बंदी, आपापल्या घरातच भजन-आरती करावी
- पूजेसाठी पुरोहिताला घरी बोलवू नये, घरीच पूजा करावी किंवा ऑनलाईन पूजा करावी
- विसर्जनाच्या दिवशीच्या म्हामंद प्रथेसाठी इतर कुणालाही घरी न बोलावता कुटुंबीयांनीच ते करावे
- विसर्जन मिरवणुका न काढता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. मूर्तीसोबत फक्त दोनच सदस्यांना परवानगी