कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या शतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यात महाराष्ट्राला ६ विकेट राखून पराभूत केले. हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. त्यांनी आपल्या पहिल्या साखळी सामन्यात दिल्लीवर मात केली होती. या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. महाराष्ट्राच्या डावाची खराब सुरुवात झाली. धवल कुलकर्णीने भेदक मारा करत झटपट चार विकेट घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्राची ४ बाद ३८ अशी अवस्था झाली होती. मात्र, यश नहार (११९) आणि अझीम काझी (१०४) यांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे महाराष्ट्राने ५० षटकांत ९ बाद २७९ अशी धावसंख्या उभारली. मुंबईकडून धवल कुलकर्णीने ५ विकेट घेतल्या.
Shreyas Iyer 102 runs in 98 balls (9×4, 1×6) Mumbai 278/4 #MAHvMUM @paytm #VijayHazareTrophy Scorecard:https://t.co/nQ29Pm3DOb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 23, 2021
पृथ्वी-यशस्वीची चांगली सुरुवात
२८० धावांचा पाठलाग करताना मुंबईचे युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची संयमी सुरुवात केली. या दोघांनी १४.५ षटकांत ६७ धावांची भागीदारी रचल्यावर डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने शॉला ३४ धावांवर बाद केले. काही काळाने यशस्वी ४० धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यरने मात्र एक बाजू लावून धरत ९९ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी केली. त्याला सूर्यकुमार यादव (२९) आणि शिवम दुबे (४७) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबईने हा सामना ६ विकेट आणि १६ चेंडू राखून जिंकला.