इंडियन प्रीमियर लीग (IPL) या जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धेबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. आयपीएल स्पर्धेचा खेळाडू लिलाव नुकताच पार पडला. त्यामुळे आता आयपीएल स्पर्धा कधी आणि कुठे होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आयपीएलचा मागील मोसम युएईत शारजाह, दुबई आणि अबू धाबी येथे झाला होता. यंदा मात्र ही स्पर्धा भारतात होणार असून ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत पार पडले अशी चर्चा आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात ठेवण्यात येईल. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
सहा शहरांमध्ये सामने
यंदा आयपीएल स्पर्धा ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत पार पडण्याची शक्यता आहे. ५२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे सामने अहमदाबाद, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू अशा सहा शहरांमध्ये होऊ शकतील. बीसीसीआयने नुकतेच सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे करंडक या दोन स्थानिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. तसेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच झाली असून या दोन संघांमध्ये टी-२० व एकदिवसीय मालिकाही पार पडणार आहे. त्यामुळे यंदाचे आयपीएल भारतात होण्याची शक्यता वाढली आहे.
खेळाडू लिलाव पार पडला
आयपीएलचा खेळाडू लिलाव मागील महिन्यात पार पडला. या लिलावात परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला १६.२५ कोटी रुपयांत राजस्थान रॉयल्स संघाने खरेदी केले. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि कायेल जेमिसन यांसारख्या खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली.