मुंबई पोलीस सोशल मीडियाद्वारे नेहमीच मुंबईकरांची जनजागृती करत असतात. मात्र अनेकदा मुंबईकर आणि मुंबई पोलीस यांच्यात बराच संवाद हा ट्विटरच्या माध्यमातून होताना दिसतो. नुकताच मुंबईकरांनी वाहतूक कोंडीबाबत पोलिसांपुढे तक्रारींचा पाढा वाचला असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातच मुंबई पोलिसांकडून मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त करणारे एक ट्विट केले आहे. नेहमी मुंबई पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच चर्चा होत असते. मात्र आज मुंबईतील वाहतूक कोंडीच्या असुविधेबद्दल मुंबई पोलिसांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
Dear Mumbaikars, we have been receiving several messages about the jams you are stuck in. We regret the inconvenience but we wish to remind that government has imposed new restrictions on inter-district travel, thus, checking is more intense. Please plan judiciously. pic.twitter.com/mePdst0U9c
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 23, 2021
सध्या राज्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात येऊन मुंबई पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. यात बराच वेळ लागत असल्याने मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत मुंबई पोलिसांना मुंबईकरांच्या तक्रारी आल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबई पोलिसांनी मुंबईकरांची क्षमा मागत एक ट्वीट केले आहे. ‘प्रिय मुंबईकरांनो, तुम्ही मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकले आहात, या संदर्भातील अनेक संदेश आम्हाला येत आहेत. तुम्हाला होणाऱ्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सरकारने आंतरजिल्हा प्रवासावर नवीन निर्बंध लादले आहेत, त्यामुळे मुंबईतील वाहनांची तपासणी अधिक वेगाने होत आहे. तुम्हाला वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्ही तसे नियोजन करून आपला प्रवास करा, या आशयाचं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे. ‘
दरम्यान, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव निय़ंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. हे निर्बंध २२ एप्रिल ते १ मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत क्वारंटाईनचे नवे नियम काय?, लग्न समारंभासाठी नवे निर्बंध यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्य आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना ई पासची आवश्यकता असणार आहे. नागरिकांना काही महत्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई-पास काढणं बंधनकारक असणार आहे.