महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालेले आहे. या अधिवेशनात संपुर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. मराठा आरक्षण आणि दुष्काळ हे दोन मोठे प्रश्न सरकारसमोर आहेत. आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत मराठा आरक्षण, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातील कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी “एकनाथ खडसे तुम्ह संघर्ष करो, “हम तुम्हारे साथ है” अशीही घोषणा दिली. त्यामुळे विधीमंडळात एकच आश्चर्य व्यक्त केले जात होते.
आज पहिल्या दिवशी विरोधकांसहीत सरकारमधील शिवसेनेच्याही आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेना आमदारांनी राज्यभरातील झाडे मारणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. तर शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी माहुल प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनवर्सन झालेच पाहिजे, अशा मागण्याचे फलक विधीमंडळाच्या पायऱ्यांवर झळकवले.
हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण गाजणार – अजित पवार
तर विधानसभा सुरु होताच वरील सर्व प्रश्नांसाठी विरोधकांनी व्हेलमध्ये उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, दिपीका चव्हाण, सुमन पाटील, पांडुरंग बरोरा यांनी व्हेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. मात्र आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि इतर माजी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव असल्यामुळे इतर प्रश्नांवर चर्चा करु नका, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी थांबवली आणि कामकाज पुन्हा सुरु झाले.