अग्निपथ योजनेवरुन देशातील अनेक राज्यात अग्नितांडव सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणासह 12 राज्यात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलने सुरू आहेत. बिहारमध्ये रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्टेशन पेटवण्यात आले आहेत. यामुळे केंद्र सरकारकडून या योजनेत महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. याबाबत एक महत्वाची घोषणा हवाई वाहतूक मंत्रालयाने केली आहे.
अग्निपथ योजनेबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाची घोषणा –
हवाई वाहतूक मंत्रालयाने ट्विटरवरुन करण्यात आलेल्या घोषणेनुसार अग्निवीरांना हवाई वाहतूक सेवा, विमान तंत्रज्ञ सेवा, देखभाल व दुरुस्ती, हवामान, हवाई दुर्घटना तपास या विभागात काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासोबतच त्यांना उड्डाण सुरक्षा, प्रशासकीय सेवा, अर्थ, आयटी आणि कम्युनिकेशन कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लॉजिस्टिक, पुरवठा आणि व्यवस्थापन शाखेतही संधी दिली जाणार आहे.
Civil Aviation is looking forward to inducting the highly skilled, disciplined and motivated #Agniveers into its various services and give them wings to fly.#AgnipathScheme #Agnipath #Agniveer #BharatKeAgniveer pic.twitter.com/UqRdvjSQ0w
— MoCA_GoI (@MoCA_GoI) June 18, 2022
ट्रेन रद्द –
अग्निपथ योजने विरोधात शनिवारीही देशाच्या विविध भागात निदर्शने सुरू आहेत. यामुळे 210 मेल एक्सप्रेस आणि 159 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तर एकूण 371 गाड्या प्रभावित झाल्या आहेत. बिहारमधील रेल्वेने मोठा निर्णय घेत पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर आग्रामध्ये यूपी प्रशासनाने कोचिंग सेंटर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मिर्झापूरमध्ये बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
केंद्र सरकारने केले महत्वाचे उपाय –
अग्निपथ योजने अंतर्गत भरती करण्यात येणाऱ्या जवानांना राज्य सरकार, खासगी उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि निमलष्करी दलातील विविध नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांमध्ये त्यांना प्राधान्य दिले जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना दिल्या जाणाऱ्या 11 लाख 71 हजाराच्या आर्थिक पॅकेज व्यतिरिक्त, नवा उद्योग सुरु करण्यासाठी अतिरिक्त संसाधनांची गरज असल्यास सरकार कमी व्याजदरात कर्ज देईल. चार वर्षांनी सेवानिवृत्त झालेल्या अग्निवीरांना रोजगार मिळेल अशी योजना आम्ही आखत आहोत, असे सिंह यांनी सांगितले.