राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. यावर मराठी कलाकारही अनेकदा मोकळेपणाने आपलं मत मांडताना दिसत असतात. अशातच राजकारणाबाबत बोलताना मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे चर्चेत आला आहे. सुबोधच्या या राजकारणाबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
रविवारी १ ऑगस्ट रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्री-प्रायमरी स्कूल तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतसूर्याचे तेज या लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुबोध भावेंनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन कायम करिअरच्या मागे धावत आहे. मला चांगली नोकरी कशी मिळेल, विदेशात जाऊन स्थायिक कसं होता येईल, हाच विचार आपण करतो. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशा लोकांच्या हातामध्ये आपण देश उभारणीचे काम दिले आहे.”
View this post on Instagram
“आपल्याला चांगला देश निर्माण करायचा असेल तर येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण देऊन राष्ट्रीय शिक्षणाचा पाया मजबूत करावा लागेल. राजकारण्यांच्या हातामध्ये देश देऊन काहीही होणार नाही. ते सर्वजण काय करत आहेत हे आपण रोजचं पाहतो.” सुबोध भावे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर असा टोला लगावला आहे.