शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली. याप्रकरणात त्यांना ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊतांना अटक केल्यापासून राज्यातील अनेक स्तरातून याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकजण संजय राऊत यांचं समर्थन करत आहेत, तर काहीजण त्यांच्या विरोधात बोलत आहेत. नुकतंच याप्रकरणी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जया बच्चन यांनी संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यासंबधीत त्यांचा एक व्हिडीओ सध्या ट्वीटवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जया बच्चन संजय राऊतांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणात अटक केल्याबाबत बोलत आहेत. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देत जया बच्चन म्हणाल्या की, नक्कीच! आमचा संजय राऊतांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना उगाच विनाकारण या प्रकरणात ओढलं जात आहे. सध्या ईडीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. फक्त ११ लाखांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात.”
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. रविवारी ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला त्यावेळी साधारण नऊ तास चौकशी केल्यानंतर रविवारी रात्री १२ नंतर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. याचं वेळी संजय राऊतांनी काहीही केले तरी मी शिवसेनेतच राहणार आहे. शिवसेना सोडणार नाही. मी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे, अशी प्रतिक्रिया आपल्या ट्वीटमार्फत दिली.