रिफायनरी प्रकल्पावरुन बारसू येथील ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांचा ताफा अडवला. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. त्यामुळे महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केला. मृदा तपासणीसाठी आलेल्या सरकारी पथकाला ग्रामस्थांनी काल अडविले होते. यानंतर आज निलेश राणेंना देखील अडविण्यात आले. यामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निलेश राणेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जागा ठरवा आपण सर्वांनी बसून बोलू, असे म्हणत विरोधकांना समजविण्याचा प्रयत्न राणेंनी केला. ग्रामस्थांना आम्हाला थांबवून सांगायचे होते, आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. तसेच ते ठिकाण सांगणार आहेत, असे निलेश राणे म्हणाले.
निलेश राणेंच्या गाडीचा ताफा अडवल्यानंतर ग्रामस्थांमध्ये रोष पाहायला मिळाला. त्यानंतर राणे गाडीतून खाली उतरले आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी आम्ही चर्चेसाठी तयार असून या चर्चेतून मार्ग निघू शकतो, असे राणे म्हणाले.
राज्यात सत्तापालट होताच पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
बारसू गावात मागील दोन दिवसांपासून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हा सर्व्हे सुरू आहे, त्या जागेची पाहणी करण्यासाठी निलेश राणे आज बारसू गावात आले होते. मात्र, त्यावेळी या ठिकाणी आंदोलक नव्हते. राणेंनी जागेची पाहणी केल्यानंतर ते जाण्यास निघाले. तेव्हाच आंदोलकांनी घटनास्थळी धाव घेऊन निलेश राणे यांचा ताफा अडवला.
विनायक राऊतांचा हल्लाबोल
केंद्र आणि राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल आहेत. ते रिफायनरीचे समर्थक आहेत. त्यामुळे बारसूत रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा घाट घालत आहे. त्याला आमचा कडाडून विरोध असून ग्रामस्थांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले.
हेही वाचा : शहाजीबापूंसारखा नौटंकी माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो, विनायक राऊतांचा हल्लाबोल