जव्हार: खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊ ठेपला आहे, त्या अनुषंगाने शेती पूर्व मशागतीला देखील वेग आल्याचे चित्र आहे.या हंगामात अधिक उत्पन्न मिळावे यासाठी बळीराजा सर्वतोपरी सज्ज झाला आहे. शिवाय, कोणत्याही प्रकारे बियाणे अथवा खतांमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभाग ही अलर्ट झाल्याचे चित्र आहे. बोगस बियाणे, जास्त दराने खत विक्री रोखण्यासाठी तालुका कृषी अधिकार्यांनी तालुका स्तरावर ५ अधिकार्यांचे भरारी पथक तैनात केले आहे.
शेतकर्यांना योग्य दरात चांगल्या दर्जाची बियाणे व खते मिळावी. यासाठी तालुका कृषी विभागामार्फत बियाणे व खतांचा पुरवठा गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते. दुसरीकडे बोगस बियाणे व खते विक्री करणार्यावर प्रशासनाचा वॉच राहणार असून जव्हार तालुका कृषी विभागाच्या वतीने एका स्वतंत्र पथकाची नेमणूक केली आहे.
पावसाळा सुरू होताच बियाणे व खतांचे दर वाढविले जातात. तसेच या कालावधीत बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. परिणामी शेतकर्यांची फसवणूक होऊन दुबार पेरणीच्या संकटाला शेतकर्यांना सामोरे जावे लागते. तालुका स्तरावर नेमलेल्या पथकात कृषी अधिकारी व संबंधित मंडळ अधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी वसंत नागरे, पंचायत समिती जव्हारचे कृषी अधिकारी व संबंधित ३ मंडळ अधिकार्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेषतः तालुक्यातील निविष्ठा विक्री केंद्रावर कृषी सहायक यांची नेमणूक करण्यात आली. तसेच कृषी सेवा केंद्रात बोगस बियाणे व जादा दराने खत व बियाणे विक्री होत असल्यास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
तालुक्यातील शेतकर्यांना मुबलक खते व बी बियाणे उपलब्ध आहेत.या करिता १६ मे रोजी डिलर सोबत सभा घेण्यात आली. यात योग्य नियोजनाद्वारे शेतकर्यांना खते व बी बियाणे उपलब्ध करून देण्याचे निश्चित झाले आहे. तरीही शेतकर्यांनी बियाण्याची विशिष्ट क्षमता तपासून पेरणीसाठी वापरावे, मात्र पेरणीपूर्वी बियाणावर बीजप्रक्रिया करून घ्यावी. तसेच विविध प्रकारच्या कंपन्याचे बियाणे खात्री करून खरेदी करावे. बियाणे व खते ठरलेल्या किंमतीत मिळते का हे तपासावे.
-वसंत नागरे, तालुका कृषी अधिकारी, जव्हार