औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इम्तियाज जलील यांच्या रुपाने मोठा पेच निर्माण झालेला असताना प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमची मागणी मान्य केली आहे. औरंगाबादमधून आता एमआयएमचा उमेदवार असणार आहे. त्याचाच अर्थ जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या बी. जी. कोळसे पाटील यांना मात्र आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, काँग्रेसदेखील या मतदारसंघात जनता दलाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवाराचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इम्तियाज जलील यांची संभाव्य बंडखोरी टळली!
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने जनता दलाचे उमेदवार बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला होता. हा विरोध भारिपचा आघाडीतील सर्वात महत्त्वाचा मित्रपक्ष एमआयएमकडून झाला होता. स्थानिक आमदार इम्तियाज जलील यांनी ‘पक्षाने निवडणुकीत किमान एक तरी जागा लढवावी’, अशी मागणी केली होती. तसेच, ‘मागणी मान्य न झाल्यास पुढील निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेऊ‘, असं सांगत सूचक इशारा देखील दिला होता. अखेर, त्यांच्या मागणीपुढे एमआयएम पक्ष आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनी देखील हात टेकले असून औरंगाबादमधून एमआयएमचाच उमदवार असेल, हे निश्चित झालं आहे.
औरंगाबादमध्ये एमआयएम जो उमेदवार देईल, त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच, ‘मुंबई उत्तर मध्य या जागेवर देखील त्यांनी उमेदवार द्यावा’ अशी विनंती मी त्यांना केली आहे.
प्रकाश आंबेडकर, प्रणेते, वंचित बहुजन आघाडी