राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोरांची नाशिकच्या मेरी परिसरात सध्या अतिशय केविलवाणी अवस्था झाली आहे. पाण्याअभावी हे मोरे सैरभैर झाले असून, त्यांना सध्या पुरेसे खाद्यही मिळत नाही. तापमानाचा पारा ३५ च्यावर गेल्याने मोरांच्या हालअपेष्टांना पारावर उरलेला नाही. त्यातच परिसरातील उनाड मुले आणि मोकाट कुत्र्यांमुळे त्यांना जीव मुठीत घेऊन रहिवास करावा लागत आहे. यापूर्वी डोंगरे आणि गीते नावाचे कर्मचारी या मोरांची काळजी घ्यायचे; परंंतु त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर या मोरांना कुणीच वाली नसल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभागही मेरीवर जबाबदारी ढकलून या राष्ट्रीय पक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत.
बारा वर्षापूर्वी या परिसरात सुमारे १०० पेक्षा अधिक मोर होते. पावसाळ्याच्या काळात मोरांचे पिसारा फुलवलेले छायाचित्र काढण्यासाठी छायाचित्रकारांची मांदियाळी असायची. परिसरातील काही उनाड मुलांनी, वाढलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी मेरीची संरक्षक भिंत तोडून आत घुसखोरी सुरू केली. त्यातूनच पुढे परिसरातील दाट वनराईवर कुर्हाड टाकतानाच मोरांचीही शिकार ही मंडळी करू लागली. दुसरीकडे पाडलेल्या संरक्षक भिंतीवरून कुत्र्यांच्याही टोळ्या परिसरात आल्या आणि त्या मोरांचा फडशा पाडू लागल्या. अशा रितीने दहा वर्षात सुमारे ७० ते ८० मोरांचा मृत्यू झाला.
पाण्याच्या कुंड्या ठेवण्याची गरज
मेरीतील मोरांच्या पाण्यासाठी काही वर्षापूर्वी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला होता. ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या कुंड्यांमध्ये दररोज पाणी टाकण्याचीही जबाबदारी काहींनी घेतली होती.
मोर मारण्यापासून अंडे फोडण्यापर्यंत स्थानिक टवाळखोरांचे उद्योग
मेरीतील मोर मारण्यापासून ते त्यांचे अंडे फोडण्यापर्यंतचे प्रकार काही मंडळी नियमितपणे करत असतात. या गोष्टी घडू नयेत म्हणून सुरक्षारक्षक तैनात असला तरीही परिसराची व्याप्ती बघता तो कोठे कोठे लक्ष देणार, असा प्रश्न निर्माण होतो.
सावलीलाही पारखे
मेरीत पूर्वी दाट झाडी होती; परंतु अनधिकृत वृक्षतोड वाढल्याने झाडांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे मोरांना सावलीसाठी भटकंती करावी लागते. त्यातच रात्रीच्या वेळी परिसरातील कचरा पेटवून देण्यात येतो. त्याचाही मोरांना प्रचंड त्रास होतो.
उष्माघाताने मृत्यू वाढले
उष्माघाताने मोरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातच तहान लागल्यावर मोरांना पाणीच न मिळाल्याने मृत्युमूखी पडणार्यांची संख्या अलिकडच्या काळात वाढली आहे.
जैविक कचर्याचा त्रास
जैविक कचरा टाकण्यासाठीही मेरी परिसराचा उपयोग काही मंडळी करतात. तसेच लास्टिकच्या पिशव्याही येथे टाकल्या जाता. या प्रदूषणाचा मोरांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.
कोरड्या पाटाने हाल वाढले
मेरी परिसरातून गेलेला गंगापूर डावा कालवा अर्थात पाट हा पूर्णत: कोरडाठाक झाला आहे. त्यामुळे मोरांना पाण्याचा शोध घेत वणवण भटकावे लागत आहे. परिसरात काही कुंड्या असल्या तरीही त्या नियमित भरल्या जात नाहीत.
उन्हामुळे या परिसरातील मोरांचेही हाल
सिन्नर तालुक्यातील मोहदरी, देवनदी किनारा, देवपूर, वडगाव, मनमाड शिवारातील नागापूर, कळवण तालुक्यातील निवाणे, द्हयाने बारी, पाडवा बारी, गोडीनदरा, तेलदय, गावदरा, मोड्या, पेढेडोंगर. येवला तालुक्यातील ममदापूर- राजापूर अभयारण्य, सातपूरमधील शिवाजीनगर