एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला असल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली असून, गेल्या काही दिवसांपासून मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर कामगार संघटनांनी नकार दर्शविल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.
राज्यातील २५० एसटी डेपोंपैकी १६० डेपो सध्या बंद आहेत. राज्यातील आणखी काही डेपोंतील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार असल्यामुळे हा संप आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपामुळे दिवाळी संपवून गावाकडून घरी परतणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. स्थानकांतून गर्दी झालेली असताना एकही बस आगारातून बाहेर पडलेली नाही. संपाला १७ कामगार संघटनांच्या कृती समित्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. संघर्ष कामगार युनियननेही ‘संपूर्ण बंद’ हाक दिल्यामुळे सोमवारपासून राज्यभर एसटी सेवा ठप्प झाली आहे.
दरम्यान, राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचार्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी करीत एसटीतील १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर कर्मचार्यांनी २८ ऑक्टोबर रोजी उत्स्फूर्त संपही सुरू केला. त्यामुळे दिवाळीपूर्वी राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक सेवा कोलमडली. आंदोलनाची दखल घेत महामंडळाने समितीच्या मागण्या मान्य करण्याबरोबरच वार्षिक वेतनवाढ आणि विलिनीकरणाच्या मागणीवर दिवाळीनंतर चर्चेचे आश्वासन दिले. त्यामुळे समितीने उपोषण आणि संप मागे घेतला.
पण काही डेपोंमधील कर्मचार्यांनी विलिनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी देण्याच्या मागणीसाठी संप सुरूच ठेवला. आता हा संप आणखी चिघळळला आहे. कारण हळूहळू राज्यातील इतरही एसटी डेपोंमधील कर्मचारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
संपामुळे एसटी प्रवाशांचे हाल
एसटीच्या कामगारांनी आपली मागणी ताणून धरत संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. गेले काही दिवस राज्यात विविध भागात एसटी आगारांतून संप पुकारला जात होता. मात्र सोमवारी सर्वच ठिकाणी एकत्रित बस फेर्या बंद ठेवल्या गेल्या.एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी आठवडाभरापासून विविध आगारांतून आंदोलन केले जात आहे. बस फेर्या बंद ठेवल्याने प्रवाशांना विविध ठिकाणी अडकून पडावे लागले. कर्मचार्यांच्या मागणीबाबत शासन आणि न्यायालयीन स्तरावर निर्णय होणे बाकी असल्याने कर्मचार्यांनी येथील आगारात ठिय्या मांडला. या आंदोलनामुळे आगारातून ग्रामीण आणि लांब पल्ल्याच्या जवळपास २५४ फेर्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ज्या प्रवाशांना बंदची कल्पना नव्हती त्यांना स्थानकातच अडकून पडावे लागले.
हे ही वाचा – मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापना