घरक्राइमMira Road Murder Case : सानेला सरस्वती 'मामा' म्हणायची... धक्कादायक माहिती समोर

Mira Road Murder Case : सानेला सरस्वती ‘मामा’ म्हणायची… धक्कादायक माहिती समोर

Subscribe

मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांडापेक्षा भयानक हत्याकांड मीरा रोड येथे घडले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जोडीदाराची निर्घृण हत्या (Mira Road Murder Case) केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये उकडले आणि नंतर ते तुकडे ग्राइंडरमध्ये बारीक करून सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेजाऱ्यांना आलेल्या संशयामुळे पोलिसांनी त्याला वेळीच बेड्या ठोकल्या. पण पीडित महिला आरोपीला ‘मामा’ म्हणायची, अशी माहिती समोर आली आहे.

सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) असे मृताचे नाव असून आरोपीचे नाव मनोज साने (Manoj Sane) आहे. सरस्वती वैद्य ही अनाथ असल्याचे सांगण्यात येते. अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालिका आश्रमातून (Jankibai Apte Balika Ashram) 32 वर्षीय सरस्वतीने शिक्षण घेतले होते. सरस्वती मनोज सानेला ‘मामा’ म्हणायची. मामा खूप श्रीमंत आहे आणि त्याची कापड गिरणी आहे, असे सरस्वतीने आश्रमात सांगितले होते. दोघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून यायचे. सरस्वती तिच्यासोबत इतर मुलांसाठी खाद्यपदार्थ आणि कपडे आणत असे. सरस्वती 18 वर्षांची झाली तेव्हा तिने आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी आश्रम सोडला. पूर्वी ती खूप आनंदात असायची, पण दोन वर्षांपूर्वी ती आली, तेव्हा ती दुःखी होती आणि नीट बोलत नव्हती, असे आश्रमातील कर्मचारी अनू साळवे यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला सांगितले.

- Advertisement -

पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे जप्त करून आरोपी मनोज साने याला अटक केली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. दोघांमध्ये वारंवार भांडणे सुरू होती. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने घरात तणावाचे वातावरण होते. सरस्वतीने 3 जून रोजी आत्महत्या केली, अशी माहिती आरोपीने दिली. या आत्महत्याप्रकरणात आपण अडकू नये, या भीतीने आपण मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले. तथापि, आरोपी अशा प्रकारच्या कहाण्या सांगत असतात. त्यामुळे त्यावर लगेच विश्वास ठेवता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सरस्वती ही अनाथ असल्यामुळे कुणीही तिची चौकशी करणार नाही, असा सानेचा होरा होता. मात्र, तो पूर्णपणे चुकला. मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे शंभर तुकडे केले असल्याचा दावा शेजारी राहणाऱ्यांनी केला आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आणि सरस्वती कधीही आजूबाजूच्या लोकांशी संबंध ठेवत नसत. त्यांच्या दरवाजावर नेमप्लेटही नव्हती. आता पोलीस तपासात नेमके काय सत्य समोर येते, याची प्रतीक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -