नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कथित हलगर्जीपणा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दिल्ली पोलिसांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत काँग्रेसने राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. 24 डिसेंबर रोजी दिल्लीतील भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा पाहायला मिळाला. गर्दी हाताळण्यात तसेच राहुल गांधींना सुरक्षा पुरविण्यात दिल्ली पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि भारत यात्रींनाच राहुल गांधी यांच्याभोवती सुरक्षेचे कडे करावे लागले, असा आरोप काँग्रेसने या पत्रात केला आहे.
Congress writes to Union Home Minister Amit Shah and requests him “to take immediate steps to ensure the safety and security of Rahul Gandhi and of all the Bharat Yatris and leaders joining Bharat Jodo Yatra” pic.twitter.com/tCsbyh9D6J
— ANI (@ANI) December 28, 2022
त्रास देण्याच्या हेतूने भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यांची आयबीकडून चौकशी केली जात असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. एवढेच नव्हे तर, लोकांना यात्रेत सहभागी होण्यापासून रोखले देखील जात आहे. एजन्सीकडून त्यांचा छळ केला जात आहे. अनेक बड्या व्यक्तींनाही यात्रेत येऊ दिले जात नाही, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्राचे यात्रेसंदर्भात पत्र
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने आठवड्याभरापूर्वी राहुल गांधींना पत्र लिहिले होते. या पत्रात राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास प्रवास पुढे ढकलण्यात यावा. प्रवासात मास्क आणि सॅनिटायझर वापर करावा. केवळ लसीकरण झालेल्यांनीच यात्रेत सहभाग घ्यावा. प्रवासात सामील होण्यापूर्वी आणि नंतर प्रवाशांना आयसोलेट करावे. हे नियम पाळण्यात काही अडचण आल्यास लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन देशहितासाठी ही यात्रा काही काळ पुढे ढकलली जाऊ शकते, असा सल्ला या पत्रातून राहुल गांधी यांना केंद्राने दिला होता. त्यावरून काँग्रेसने सडेतोड टीका केली होती.