पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा समितीचे सदस्य आणि माजी नगरसेवक मनिष शुक्ला यांची टीटागढ येथे रविवारी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेची दखल घेत आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेप्रकरणी बंगालचे राज्यपाल जयदीप धंकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलं आहे.
ACS Home @MamataOfficial and DGP @WBPolice have been summoned at 10 am tomorrow in the wake of worsening law and order situation leading to dastardly killing of Manish Shukla, Councillor, Titagarh Municipality in political party office.
— Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) October 4, 2020
टीटागढमध्ये रविवारी सायंकाळी भाजपाच्या २४ उत्तर परगना जिल्हा समितीचे सदस्य असलेल्या मनिष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. मनिष शुक्ला हे पक्ष कार्यालयात जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेवरुन भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी TMC वर आरोप केले आहेत. TMC च्या गुंडांनी मनिष शुक्ला यांची हत्या केली, असा आरोप त्यांनी केला आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून मनिष शुक्ला यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत बंगालचे राज्यपाल जयदीप धंकर यांनी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलं आहे. राज्यपालांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याचे गृह सचिव, अतिरिक्त गृहसचिव कृष्णा द्विवेदी व पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक विरेंद्र यांना आज उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसचा हा राजकीय दहशतवाद असल्याची टीका भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे. “भाजपचे युवा नेते आणि माजी नगरसेवक मनिष शुक्ला यांची हत्या निंदनीय आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेखाली असलेल्या पश्चिम बंगालमधील रक्तरंजित राजकारणाचं हे उदाहरण आहे. या राज्य सरकारकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकते का? असा सवाल घोष यांनी केला आहे.