नवी दिल्लीः सुमारे १.४७ लाख जणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली. देशभरात भव्य रोजगार मेळावे सुरु असल्याचेही केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री कार्मिक जितेंद्र सिंह यांनी यासंर्दभात राज्यसभेत लेखी उत्तर दिले. ते म्हणाले, देशभरात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. तरुणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र दिले जात आहे. याअंतर्गत सुमारे १.४७ लाख जणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
हवालदार, शिक्षक, व्याख्याते, परिचारिका, परिचारिका अधिकारी, डाॅक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर व अन्य पदांचे हे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती अशा विविध कारणांमुळे पदे रिक्त होतात. ही पदे भरली जात नाहीत तोपर्यंत अन्य पदे रिक्त होतात. या प्रक्रियेमुळेच पदे भरण्यास विलंब होतो, असे मंत्री कार्मिक जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
लोकसेवा आयोग व अन्य स्पर्धा परिक्षांद्वारे सरकारी कार्यालयातील रिक्त पदे भरली जातात. रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. रोजगार मेळाव्याचे आयोजन वेळोवेळी सरकार करत आहे. भविष्यात रोजगार व स्वयंरोजगार मेळावे अशाच प्रकारे आयोजित केले जातील. जेणेकरुन अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळू शकेल, असेही मंत्री कार्मिक जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले.