माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. आज संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी शांती भूषण हे ९७ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शांती भूषण कायदा मंत्री होते. १९७७ ते १९७९ या काळात त्यांनी हे पद भूषवले.
Former Law Minister and Senior Advocate Shanti Bhushan passes away.
(File pic) pic.twitter.com/UY2irnYAx5
— ANI (@ANI) January 31, 2023
शांती भूषण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील एका प्रसिद्ध खटल्यात राजनारायण यांची बाजू मांडली होती. या प्रकरणामुळे १९७४ मध्ये इंदिरा गांधींना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. इंदिरा गांधींवर निवडणूक जिंकण्यासाठी लाच घेतल्याचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. शांतीभूषण यांनी राजनारायण यांच्यासाठी खटला लढवला आणि जिंकला.
शांती भूषण हे काँग्रेस (ओ) आणि नंतर जनता पक्षाचे सदस्य होते. ते राज्यसभेचे खासदारही होते. १९८० मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि १९८६ मध्ये भाजपचा राजीनामा दिला. शांती भूषण यांनी २०१८ मध्ये ‘मास्टर ऑफ रोस्टर’ प्रणालीत बदल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण हे त्यांचे पुत्र आहेत. शांती भूषण आणि प्रशांत भूषण हे आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. नंतर त्यांनी पक्षापासून फारकत घेतली.
हेही वाचा : मोरबी पूल दुर्घटना; आरोपी जयसुख पटेल न्यायालयासमोर शरण