माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या मृत्यूची माहिती ट्विट करत दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
With a Heavy Heart , this is to inform you that my father Shri #PranabMukherjee has just passed away inspite of the best efforts of Doctors of RR Hospital & prayers ,duas & prarthanas from people throughout India !
I thank all of You 🙏— Abhijit Mukherjee (@ABHIJIT_LS) August 31, 2020
प्रणव मुखर्जी यांची १० ऑगस्टपासून प्रकृती बिघडली होती. त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचे निदान झाल्यानंतर १० ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी घेतली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यांची प्रकृती अधिकच खालावत चालली होती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असे रुग्णालयाने सांगितले होते.
प्रणव मुखर्जी २०१२ साली भारताचे राष्टपती बनले. प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणात दिलेल्या अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते. १९८२ ते ८४ या काळात प्रणव मुखर्जी देशाचे अर्थमंत्रीपद होते. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.
भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी राजकीय कारणांमुळे प्रणव मुखर्जी यांना बाजूला करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी प्रणव मुखर्जी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) सरकार आलs तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.