गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानच्या १९४७ साली झालेल्या फाळणीसाठी पाकिस्तान आणि ब्रिटिश यांनाच जबाबदार धरले जात आहे. अजूनही फाळणीचा विषय निघाला की ब्रिटिशांना किंवा पाकिस्तानला दोषी धरलं जातं. मात्र, भारताच्या माजी उपराष्ट्रपतींचं मत मात्र या बाबतीत वेगळं आहे. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ‘१९४७ साली झालेल्या अखंड भारताच्या फाळणीसाठी पाकिस्तान आणि ब्रिटिशांइतकेच भारतीयही कारणीभूत आहेत,’ असं वक्तव्य हमीद अन्सारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
‘आपण मानायला तयारच नाही आहोत‘
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमामध्ये बोलताना हमीद अन्सारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘सीमेपलीकडचे म्हणजेच पाकिस्तानमधील लोकं आणि ब्रिटिश फाळणीसाठी जबाबदार आहेत यावर लोकांचा विश्वास आहे. किंबहुना भारतीयांना त्यावरच विश्वास ठेवायला आवडतं. पण आपणही फाळणीसाठी तितकेच जबाबदार आहोत, हे मानायला आपण तयारच नाही आहोत.’
तुम्ही हे वाचलंत का? – पाकिस्तानकडून भारताला ‘१० सर्जिकल स्ट्राइक’ची धमकी
सरदार पटेलांच्या भाषणाचा संदर्भ
दरम्यान, हमीद अन्सारी यांनी यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ११ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणजेच फाळणीच्या ४ दिवस आधी केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि वाटाघाटी केल्यानंतर फाळणीचा निर्णय घेतल्याचं त्या भाषणात पटेल म्हणाले होते असं अन्सारी यांनी सांगितलं आहे. शिवाय, आपला आधी फाळणीला विरोध होता, मात्र एवढी चर्चा केल्यानंतर भारताला एकसंध ठेवण्यासाठी त्याची फाळणी करावीच लागेल हे मला पटलं, असं देखील पटेल त्या वेळी म्हणाल्याचा संदर्भ अन्सारी यांनी यावेळी बोलताना दिला.
भाजपने केली माफीची मागणी
दरम्यान, भाजपने हमीद अन्सारी यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘या वक्तव्याबद्दल हमीद अन्सारी यांनी माफी मागावी‘, अशी मागणी केली आहे.