२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होईल याबद्दल आत्ताच काहीच सांगता येत नाही असं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती खूपच किचकट आहे. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण असेल? देशाचं नेतृत्व कोण करेल? हे आत्ताच सांगणं कठिण असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे परिस्थिती खूपच रोमांचक बनली आहे असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. पाच राज्यांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रामदेव बाबा यांनी हे विधान केल्यानं त्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. बाबा रामदेव हे कट्टर भाजप समर्थक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाठीराखे म्हणून ओळखले जातात. दरम्यान, २०१९मध्ये कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. २०१४ साली बाबा रामदेव यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
माझा राजकीय उद्देश काहीच नाही. देशाला आध्यात्मिक मार्गावर नेणं हाच आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. योगाच्या माध्यमातून आम्ही देशाची वेगळी ओळख निर्माण केली. राजकारणापासून लांब राहण्याची गोष्ट बाबा रामदेव यांनी पहिल्यांदाच केलेली नाही. यापूर्वी देखील त्यांनी माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं म्हटलं आहे.
वाचा – पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही – गडकरी
गडकरींच्या नावाची चर्चा
दरम्यान, पाच राज्यांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नितीन गडकरी यांचं नाव चर्चेत आलं आहे. शिवाय, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची देखील दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे काहीशी सावध भूमिका ही बाबा रामदेव घेताना दिसत आहेत.