जम्मू काश्मीरच्या बांदीपोरातील पनार वनक्षेत्रात गेल्या सहा दिवसांपासून भारतीय लष्काराचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. तर या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान, काल सायंकाळी शोपियाँ जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये संबंधित पोलिस अधिकारी आणि त्याची बहीण जखमी झाली. कश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या वेगवेगळ्या चकमकीत मागच्या दोन दिवसात ७ जवान शहीद झाले आहेत.
#Visuals Jammu & Kashmir: One army personnel dead and two terrorists killed during an ongoing operation in Bandipora's Panar forest area. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/cYByGzFn6X
— ANI (@ANI) June 14, 2018
रामगड आणि पुलवामामध्ये ६ जवान शहीद
सांबा सेक्टरच्या रामगडमध्ये काल पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तीन ज्युनिअर ऑफिसर आणि एक काँस्टेबल शहीद झाले. १२ जूनला पुलवामाच्या कोर्ट परिसरातील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात दोन जवान शहीद झाले होते. सांबा जिल्ह्यातील चमलियाल बॉर्डरवर नारायणा चौकी येथे मंगळवारी रात्री उशीरा गोळीबार करण्यात आला. बीएसएफचे जवान या परिसरातून बंकर बनवण्यासाठी वापरले जाणारे सामान घेऊन जात असताना ही घटना घडली. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात लष्कर अधिकारी राम निवास जखमी झाले. त्यांना वाचवण्यासाठी सहाय्यक कमांडर जीतेंद्र सिंह त्यांच्या टीमसोबत गेले असता पाकिस्तानी रेंजरने त्यांना घेरत गोळीबार सुरू केला. तसेच अँटी गाईड मिसाइलनेही जवानांवर हमला केला. या हमल्यात कमांडरसह सब इन्स्पेक्टर रजनीश कुमार आणि काँस्टेबल हंसराज शहीद झाले. तर जखमी राम निवास यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पाकिस्तानला धडा शिकवा – शहीदाच्या वडीलांची मागणी
काल पहाटे सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले. त्यामध्ये जीतेंद्र सिंह (वय ३४) यांचा समावेश होता. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर पाकिस्तानविरोधात सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी शहीद जवानाचे वडील समुंद्र सिंह यांनी केली आहे. शहीद जवान जितेंद्र सिंह यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.