नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला आहे. पंतप्रधानपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडून कोण उमेदवार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार शशी थरूर यांनी त्याला उत्तर दिले आहे.
हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारी रद्द होणार माहीत असतानाही काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना तिकीट; उदय सामंत यांचा आरोप
खासदार शशी थरूर यांनी यासंबंधीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचा उल्लेख केला आहे. एका पत्रकाराने पुन्हा एकदा मला विचारले की, पंतप्रधान मोदी यांना पर्याय कोण असू शकतो? संसदीय व्यवस्थेत हा प्रश्नच गैरलागू आहे. राष्ट्राध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही कोणत्याही एका व्यक्तीला निवडून देत नाही तर, पक्ष किंवा पक्षांच्या आघाडीची निवड करतो. हा पक्ष किंवा आघाडी तत्वनिष्ठ असते तसेच भारताचे बहुविविधता, बहुतत्ववाद आणि सर्वसमावेशकता यांचे जतन करण्याला प्राधान्य देणारी असते, असे उत्तर त्यांनी या पत्रकाराला दिले आहे.
Yet again a journalist has asked me to identify an individual who is the alternative to Mr Modi.
The question is irrelevant in the Parliamentary system. We are not electing an individual (as In a presidential system), but a party, or coalition of parties, that represents a set…
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 3, 2024
पंतप्रधानपदासाठी ज्या कोणाचीही निवड होईल, तो एक अनुभवी, सक्षम आणि वैविध्यपूर्ण भारतीय नेता असेल. तो अहंकारी नसेल आणि लोकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देईल. पंतप्रधानांची निवड ही दुय्यम बाब आहे. तथापि, आपली लोकशाही आणि विविधतेचे रक्षण करणे याला प्राधान्य हवे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारी रद्द होणार माहीत असतानाही काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना तिकीट; उदय सामंत यांचा आरोप
केरळच्या थिरुअनंतपुरमचे तीन वेळा खासदार राहिलेले शशी थरूर हे चौथ्यांदा येथून लोकसभा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजपाचे राजीव चंद्रशेखर आणि डाव्या आघाडीचे पन्न्यान रवींद्रन हे निवडणूक लढवत आहेत. थिरुअनंतपुरममध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहेत.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : एनसीपी-एसपीच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल, शिंदे गटाला निर्देश…