मानवी तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला पकडण्यास मणिपूर पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीकडून १२८ मुलांची सुटका करण्यात आली आहे. यामधील काही नेपाळी मुले देखील होती. पोलिसांच्या समाज सुधारक शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. मणिपूरच्या इंफाळ भागात ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या १२८ मुलांपैकी ७३ नेपाळी मुले आहेत. पोलिसांनी लष्कराच्या मदतीने भारत-म्यानमार सीमेजवळ तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेनगर येथील एका हॉटेलवर छापा मारला होता. छाप्या दरम्यान अटक केलेल्या तस्करांची चौकशी करण्यात येत आहे. या मुलींना अगोदर म्यॅनमार आणि दुबईत नेण्यात येणार असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
“मिळालेल्या माहितीच्या आधारावर मणिपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मणिपूर पोलिसांनी केलेली ही एक मोठी करवाई आहे. या कारवाई अंतर्गत १२८ मुलांची सुटका आतापर्यंत करण्यात आली आहे. ही मानवी तस्करी करणारी एक मोठी टोळी आहे. ही टोळी देशातील लहान मुलांना म्यानमारला घेऊन जाते यानंतर त्यांना दुबईत पाठवण्यात येते. सध्या टोळीतील अनेकजण जेरबंद असून पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.” – एल. एम. खौते, मणिपूरचे पोलीस महासंचालक