मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी शनिवारी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह चार जवान शहीद झाले. याशिवाय कर्नल त्रिपाठी यांच्या पत्नी आणि सहा वर्षांचा मुलागाही यात मृत्यूमुखी पडले आहेत. ४६ आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी शनिवारी सकाळी एका लष्करी छावणीतून परतत असताना सकाळी १० च्या सुमारास म्यानमार सीमेजवळच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील शेखन गावानजीक संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचे पूर्ण कुटुंब मरण पावले. या दहशतवादी हल्ल्यामुळे आता देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी मणिपूर नागा पीपल्स फ्रंटने घेतली आहे. हल्ल्यावेळी कर्नल त्रिपाठी यांच्यासोबत परिवार होता याची माहिती नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले. एमएनपीएफने यासंदर्भात एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात त्यांनी हल्ल्यासंदर्भातील सविस्तर माहिती जाहीर केली आहे. यात त्यांनी म्हटले की, हल्ला करणाऱ्यांना जवानांसोबत कर्नलची पत्नी आणि लहान मुलं असल्य़ाची माहिती नव्हती. जवानांनी आपल्या कुटुंबियांना अशा संवेदनशील भागात आणून नये असा सल्लाही या निवेदनात देण्यात आला आहे. त्यांनी म्हटेल की, ,ज्या परिसरात सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भाग म्हणून घोषित केला, त्या भागांत परिवानाने वावरणे योग्य नाही.
एमएनपीएफचा उपप्रचार सचिव रोबेन खुमान आणि थॉमस नुमाई यांनी हे निवेदन जाहीर केले आहे. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांनी या प्रकरणातील दोषींना कोणतीही सूट न देता कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. मात्र या संघटनेवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नेमकी घटना काय ?
मणिपूरमधील ४६ आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी शनिवार सकाळी एका लष्करी छावणीतून परतत होते यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अनुजा आणि सहा वर्षांचा मुलगा अबीरही होता. अशातच म्यानमार सीमेजवळच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील शेखन गावानजीक पोहचताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी आयईडी स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी आसाम रायफल्सच्या जवानांकडूनही दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र या चकमकीत कमांडिग ऑफिसर कर्नल त्रिपाठी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय चार जवानांनाही दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेय. तर पाच जवान जखमी झाले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.