नवी दिल्ली : काही लोक पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे एक माध्यम म्हणून पाहतात, मात्र पर्यटनाचा एक फार मोठा पैलू रोजगाराशी संबंधित आहे. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारे कुठले क्षेत्र असेल तर ते पर्यटन क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्राची भरभराट करताना त्याची ख्याती वाढवणे खूप महत्त्वाचे ठरते. गेल्या काही वर्षांत भारताबद्दलचे आकर्षण खूप वाढले आहे आणि जी-20 च्या यशस्वी आयोजनानंतर जगभरातील लोकांचा भारतातील रस आणखी वाढला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा – नागपूरकरांना दिलासा देण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यग्र, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा
पंतप्रधान मोदी यांचा आज, रविवारी ‘मन की बात’चा 105वा भाग प्रसारित झाला. त्यात त्यांनी देशवासीयांशी संवाद साधताना, 27 सप्टेंबर रोजी असलेल्या ‘जागतिक पर्यटन दिना’च्या निमित्ताने पर्यटनाचे महत्त्व विषद केले. जी-20 परिषदेसाठी एक लाखाहून अधिक प्रतिनिधी भारतात आले. देशातील विविधता, विविध परंपरा, विविध प्रकारचे खाणे-पिणे आणि आपला वारसा या सर्वांची ओळख त्यांना झाली. येथे आलेले प्रतिनिधी आपापल्या देशात परत जाताना आपल्या सोबत जे सुखद अनुभव घेऊन गेले आहेत, त्यामुळे भारतात पर्यटन आणखी वाढीला लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Matter of immense pride that Santiniketan associated with Gurudev Rabindranath Tagore and the Hoysala Temples of Karnataka have been declared world heritage sites. #MannKiBaat pic.twitter.com/d3lv32rqia
— PMO India (@PMOIndia) September 24, 2023
भारतात एकापेक्षा एक सरस अशी जागतिक वारसा स्थळे आहेत आणि त्यांची संख्या सतत वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वीच शांतीनिकेतन आणि कर्नाटकातील पवित्र होयसडा मंदिरांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेली कर्नाटकातील होयसडा मंदिरे, 13व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेसाठी ओळखली जातात. या मंदिरांना युनेस्कोकडून मान्यता मिळणे, हा देखील भारतीय मंदिर स्थापत्य शैलीच्या, भारतीय परंपरेचा सन्मान आहे, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून…, संजय राऊत यांची मोदी सरकारवर रोखठोक टीका
भारतातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या आता 42 झाली आहे. भारताचा हाच प्रयत्न आहे की, आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे, जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जावीत, असे सांगून, जेव्हा कधी तुम्ही कुठेतरी पर्यटनाला जाण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न नक्की करा. विविध राज्यांची संस्कृती समजून घ्या, वारसा स्थळे पहा. यामुळे आपण आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाशी तर परिचित व्हालच, सोबत स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवण्याचं तुम्ही एक महत्त्वाचे माध्यम देखील ठराल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.