मुंबई : मुसळधार पावसाने नागपूर शहराला झो़डपले असून अवघ्या 4 तासात 100 पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे खूप हाल झाले. तर दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – शहर नियोजनाच्या बाबतीत भाजपा पूर्णपणे अपयशी, नागपूर पूरस्थितीवरून राष्ट्रवादीची टीका
नागपुरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस कोसळल्याने नागपूरचे जनजीवन विस्कळित झाले. या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, पावसाचा जोर पाहून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. शासनातर्फे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
नागपूर शहर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे शहरात अक्षरशः पूरस्थिती आहे. काही नागरीक बुडाल्याचे देखील समोर आले असून अनेकांचे संसार वाहून गेले. हि स्थिती अतिशय गंभीर आहे. शहरातील सांडपाणी आणि मलनिःसारण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा यामुळे समोर आल्या आहेत. नागपूर महापालिकेने यावर केलेल्या…
— Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2023
मात्र, यावरून राजकारण रंगत असून खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. नागपूर शहर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे शहरात अक्षरशः पूरस्थिती आहे. काही नागरिक बुडाल्याचे देखील समोर आले असून अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. ही स्थिती अतिशय गंभीर आहे. शहरातील सांडपाणी आणि मलनिःसारण व्यवस्थेच्या सर्व मर्यादा यामुळे समोर आल्या आहेत. नागपूर महापालिकेने यावर केलेल्या कामाचा दर्जा काय आणि कसा आहे हे देखील यामुळे स्पष्ट झाले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – …असे त्यागमूर्ती आता निर्माण होणार नाहीत, संजय राऊत यांचे भाजपावर शरसंधान
या सर्व परिस्थितीत स्वतः नागपूर शहरातून निवडून येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल, शनिवारी मात्र नागरिकांना दिलासा देण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांमध्ये मग्न होते. आपण ज्या भागाचे नेतृत्व करतो तेथील जनतेला अशा कठिण प्रसंगी वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. त्यांना जनतेपेक्षा हायकमांड महत्वाची वाटते, असेच यातून स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली.