भारत-नेपाळ सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं आहे. जगातील कोणतीच शक्ती हे नातं तोडू शकणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी उत्तराखंडमध्ये व्हर्च्युअल मेळावा घेतला. यावेळी त्यांनी भारत-नेपाळ सीमावादावर भाष्य केलं.
“लिपुलेखमधील रस्त्याबद्दल नेपाळला झालेल्या गैरसमजाचे निराकरण चर्चेद्वारे केलं जाईल. नेपाळशी आमचे खूप चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांमधील संबंध सामान्य नाहीत, तर आम्ही ‘रोटी-बेटी’च्या नात्यात अडकलो आहोत आणि जगातील कोणतीही शक्ती तोडू शकत नाही,” असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. भाजपच्या उत्तराखंडमधील व्हर्च्युअल मेळाव्यातील लोकांना संबोधीत केलं. यावेळी त्यांनी भारत-नेपाळ या दोन देशांच्या संबंधावर प्रकाश टाकला.
१८ मे रोजी नवीन नकाशा प्रसिद्ध
नेपाळने १८ मे रोजी एक नवीन नकाशा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये भारताची कलापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा हे नेपाळमध्ये दाखवले. या हालचालीमुळे भारत आणि नेपाळमधील मैत्रीला तडा जाऊ लागला. भारताने याचा तीव्र विरोध केला आहे पण नेपाळ आता या नकाशावर ठाम आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतावर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप केला. ११ जून रोजी नेपाळच्या मंत्रिमंडळाने ९ लोकांची समिती स्थापन केली.
हेही वाचा – गांधी कुटुंबाचं राष्ट्रीय हितासाठी योगदान नाही – स्मृती इराणी
नेपाळच्या संसदेने विवादित राजकीय नकाशावर सादर केलेल्या घटना दुरुस्ती विधेयकास नुकतीच मान्यता दिली आहे. यावेळी, विरोधी पक्ष नेपाळी कॉंग्रेस आणि जनता समाजवादी पार्टी नेपाळ यांनी राज्यघटनेच्या तिसर्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती संबंधित सरकारच्या विधेयकाचं समर्थन केलं. हे घटनादुरुस्ती विधेयक आता अध्यक्ष विद्या देवी भंडारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलं आहे. संसदेत पास झालेल्या या नव्या नकाशामध्ये नेपाळने आपल्या प्रदेशात कलापाणी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवले आहेत. या वादग्रस्त विधेयकाच्या बाजूने २७५ सदस्यांपैकी २५८ मते मिळाली.