महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता राज्याच्या सचिवालयात त्यांची भेट झाली. ईव्हीएममार्फत होणाऱ्या मतदानासंबंधी चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात होते. या नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांसमोर येऊन देशात सुरु असलेल्या भाजपच्या सत्त्ताराजबाबत नाराजी व्यक्त केली. तर राज ठाकरे यांनी आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्यापैकी कोणावरच विश्वास उरला नाही, असे एका वाक्यात समर्पक उत्तर दिले. ईव्हीएम विरोधात मुंबईमध्ये मोठ्या संख्येने मोर्चाचे आयोजन मनसेतर्फे करण्यात येणार असून यासाठी ममता बॅनर्जी यांना आमंत्रण देण्याकरता आपण त्यांची भेट घेतली असल्याचे राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
Raj Thackeray, Maharashtra Navnirman Sena (MNS) on being asked if he will move Court against EVMs: I have no expectations from High Court, Supreme Court and the Election Commissioner. pic.twitter.com/2NVtqXZ3eI
— ANI (@ANI) July 31, 2019
देशातील राजकीय वातावरण आणि ईव्हीएमच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ईव्हीएम नको, बॅलेट पेपर आणा, अशी मागणी मनसेने केली आहे. बॅलेट पेपरच्या मागणीसाठी राज ठाकरे विरोधकांची भेट घेत आहेत. राज ठाकरे यांनी याआधी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. याबाबत त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. आता ते ममता बॅनर्जींना भेटले आहेत.
West Bengal Chief Minister, Mamata Banerjee: If all industrialists leave the country like this or commit suicide, don't you think it is a dangerous signal for the country? I'm feeling sad today because it should not be the future of the industry or agriculture. pic.twitter.com/Dpbk2CJfO7
— ANI (@ANI) July 31, 2019
तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांना ठाकरे यांनी दूरध्वनी केला होता. त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली.