देशातील अनेक राज्यांमधील तापमानात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. काही राज्यातील थंडीचा पारा चढला असून, काही राज्यांतील तापमानात वाढ झाली आहे. तसेच, पुन्हा एकदा अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात झपाट्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. दिल्ली ते यूपीपर्यंत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. (national weather update today imd rainfall alert)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहील. तसेच, दिल्लीत गुरुवारी किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 2 अंश कमी आहे. आजही दिल्लीचे किमान तापमान 15 अंश राहणार असून, कमाल तापमान 32 अंश असेल.
त्याशिवाय, ईशान्य दिशेकडून वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे उत्तर-पूर्व मान्सून सुरू होईल. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये २९ ऑक्टोबरपासून पावसाच्या हालचाली सुरू होतील. वायव्य दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उर्वरित भारतातील तापमानात घट होईल.
‘या’ राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम मध्य आणि लगतच्या दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. त्याच वेळी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते नैऋत्य बंगालच्या उपसागरमार्गे तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. हवामान खात्याने आज तामिळनाडू आणि केरळमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. या राज्यांमध्ये आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
29 आणि 30 ऑक्टोबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, कोस्टल आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि केरळमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील दोन दिवसांत उत्तर-पूर्व राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस देशाच्या उर्वरित भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशात थंडीचा जोर
हिमाचल प्रदेशात, राज्यात आठवडाभर हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. उन्हामुळे दिवसा तापमानात वाढ होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. रात्री थंडीपासून आराम मिळत नाही. हिवाळा जवळ आल्याने मैदानी भागातील रात्री आता खूपच थंड झाल्या आहेत.
हेही वाचा – टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…