ठाणे : रशिया आणि युक्रेन येथील युद्ध परिस्थितीमुळे युक्रेन येथे ठाणे जिल्ह्यातील २५३ विद्यार्थी अडकून पडल्याची बाब पुढे आली आहे. ही जरी चिंतेची बाब असली तरी त्यापैकी ९४ विद्यार्थी आतापर्यंत युक्रेनमधून मायदेशात परतले आहेत. त्यातील ५४ जण हे सुखरूपपणे आता आपापल्या घरी पोहोचली असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली.
रशिया युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर भारतातील अनेकजण युक्रेनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातील काही जणांचा आकडा पुढे येत होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील आणखी काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत का याची माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहे.
तसेच जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ या संपर्क क्रमांकावर आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासह इतर शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा गेल्या काही दिवसात २५३ वर पोहोचला आहे. त्यातील ९४ जण आतापर्यंत भारतात परतले आहेत. त्यातील ५४ विद्यार्थी आपापल्या घरी परतले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या २१० विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळी एअरफोर्सच्या दोन C-17 विमानातून मायदेशी परत आणले. केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याशिवाय एअरलाईन्स कंपनी इंडिगोच्या एक विशेश विमानाने २१९ भारत नवीन दिल्ली एअरपोर्टवर उतरले. याव्यतिरिक्त एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी युक्रेनहून १८५ भारतीय घेऊन मायदेशी परतले. अशाप्रकारे एका रात्रीत ६०० भारतीयांना ऑपरेशन गंगाद्वारे भारतात आणले.