डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव नेते होते की ज्यांचा महानिर्वाण दिन आणि जयंती साजरी करण्यासाठी सामान्य माणसापासून ते अगदी ख्याती पावलेले व्यक्ती एकत्र येऊन त्यांचे स्मरण करतात. 14 एप्रिल ही त्यांची जयंती फक्त एका दिवसापुरती मर्यादीत न राहता त्यांच्या विचारांची माणसे जिथेजिथे कार्यरत आहेत, तिथे सलग तीन-चार दिवस महोत्सव होत असतो. डॉ. आंबेडकरांची यशोगाथा गाण्यातून, नृत्यातून सादर केली जाते. लोकशाहीर संभाजी भगत यांनी विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसाच्या सहकार्याने कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
‘भीमाचे विधान, सोडवा संविधान’ या गीताच्या ओळी आहेत. संविधानाच्या संदर्भात अनेक गाणी रचलेली आहेत. स्वत: लोकशाहीर संभाजी भगत हे सादर करणार आहेतच, परंतु त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक नवकलाकार या निमित्ताने व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. डॉ. आंबेडकरांचे विचार जयंतीच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहचावेत हा या कार्यक्रम निर्मिती मागचा मुख्य उद्देश आहे. जयंतीच्या रणांगणासाठी सज्जअशी काहीशी जाहिरात करून आयोजकांशी संपर्क साधणे त्यांनी सुरू केले आहे.