घरफिचर्ससारांशवनवासातील पहिला मुक्काम श्रृंगवेरपूर!

वनवासातील पहिला मुक्काम श्रृंगवेरपूर!

Subscribe

रामायण यात्रा दर्शनच्या सहाव्या भागात बक्सर येथील ज्या परिसरात विश्वामित्र गुरूंच्या आज्ञेने श्रीरामाने त्राटिका राक्षसीचा वध केला त्या रामरेखा घाटाविषयी माहिती घेतली. आजच्या भागात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील पहिला मुक्काम केलेल्या श्रृंगवेरपूर या स्थानाचे महात्म्य पाहणार आहोत.  रामायणात श्रृंगवेरपूर स्थानाचे खूप महत्त्व आहे. अयोध्येपासून 80 किमी अंतरावर आणि प्रयागराजपासून लखनऊ रोडवर 45 किमी अंतरावर गंगेच्या काठावर हे प्राचीन धार्मिक स्थान आहे. वाल्मिकी रामायणातील अयोध्याकाण्ड या भागात श्रृंगवेरपूरचा उल्लेख आहे.

– विजय गोळेसर 

वनवासाला जाताना प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी पहिला मुक्काम श्रृंगवेरपूर येथे केला होता. येथूनच श्रीराम, लक्ष्मण, सीता यांनी गंगा नदी पार केली होती आणि येथूनच श्रीरामाने दशरथ राजाचे महामंत्री सुमंत यांना अयोध्येला परत पाठविले होते. भरत जेव्हा श्रीरामाला भेटायला चित्रकूट येथे गेले होते, तेव्हा तेदेखील श्रृंगवेरपूर येथे आले होते. अध्यात्म रामायणातील अयोध्याकाण्डामध्येही श्रीराम गंगेच्या काठावरील श्रृंगवेरपूर येथे आले होते. त्याचे वर्णन आहे. येथेच श्रीराम शीशम वृक्षाखाली बसले होते. रामायणात या वृक्षाचा ‘इंगुदी’ किंवा ‘हिंगोटी’ असा उल्लेख केलेला आहे.  विशेष म्हणजे आजही तो शीशम वृक्ष येथे पाहायला मिळतो. वनवासाला जाताना श्रीराम, सीता आणि लक्ष्मण येथे रात्रभर राहिल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणाप्रमाणेच अध्यात्म रामायण, कालिदासचे रघुवंश, भवभुतीचे उत्तर रामायण आणि तुलसीदासजींच्या रामचरितमानस या ग्रंथांत केलेले आहे.

- Advertisement -

महाभारतात श्रृंगवेरपूरला तीर्थरूप म्हटले आहे. अयोध्येपासून हे ठिकाण 80 किमी अंतरावर एका लहानशा टेकडीवर वसलेले आहे. येथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता एक रात्र राहिले. त्या स्थानाला ‘रामचौरा’ असे म्हणतात. हल्लीच्या ‘कुरई’ नावाच्या गावात हे ठिकाण आहे. रामायण काळात श्रृंगवेरपूर ही निषादराज गुहा याची राजधानी होती. या राज्यात मच्छीमार राहत असत. अयोध्येहून वनवासाला निघालेले श्रीराम, सीता, लक्ष्मण जेव्हा येथे आले तेव्हा त्यांना समुद्रासारखी विशाल गंगा नदी पार करण्यासाठी नावेची गरज होती, परंतु एकही नावाडी त्यांना आपल्या नावेत बसवायला तयार नव्हता.

यामागे एक कारण होते. श्रीरामाच्या चरणस्पर्शामुळे शिळा असलेल्या अहिल्येचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले होते, ही गोष्ट या नावाड्यांना माहीत असल्यामुळे त्यांना भीती वाटत होती की रामाच्या स्पर्शाने आपल्या नावेचेही एखाद्या स्त्रीमध्ये रूपांतर झाले तर आपल्या पोटासाठी पैसे मिळवून देणारी नाव नष्ट होईल. यामुळे कुणीही नावाडी श्रीरामांना आपल्या नावेत घेईनात. श्रीराम त्यांना समजावून सांगत असताना मच्छीमारांचा राजा निषादराज गुहा आपल्या प्रमुख मंत्र्यासह तेथे आला. निषादराज गुहा श्रीरामाचा बालसखा होता, असे सांगितले जाते. विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात रामासोबत निषादराजदेखील शिकायला होता असे वर्णन आहे.

- Advertisement -

भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी तो तेथे आला. श्रीरामाला भेट देण्यासाठी त्याने फळं आणि कंदमुळं आणली होती. निषादराज गुहा याने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना आपल्या नगरात येऊन आपल्या  महालात विश्रांती घेण्याची विनंती केली, पण प्रभू रामचंद्रांनी सांगितले की,  निषादराज, मी वचनबद्ध आहे. मी आता वनवासाला निघालो आहे. त्यामुळे आता मी वनवासी नियमानुसार कोणत्याही नगरात वा महालात प्रवेश  करू शकणार नाही किंवा निवास करू शकणार नाही.

मित्रा निषादराज, वडिलांच्या आज्ञेमुळे मी 14 वर्षे ॠषीमुनींप्रमाणे वनात राहून वनवासी जीवन जगणार आहे. हे ऐकल्यावर निषादराज अत्यंत दु:खी झाले. त्यांनी शीशम नावाच्या वृक्षखाली कुश आणि कोवळी पाने यांची शय्या श्रीरामासाठी तयार केली. त्या शय्येवर श्रीराम विश्रांतीसाठी पहुडले. श्रीरामांना असं झाडाखाली झोपलेलं पाहून निषादराज लक्ष्मणाला म्हणाला, विधिलिखित किती विचित्र असतं पाहा. भगवान श्रीराम महालात शोभिवंत पलंगावर रात्री निवांत झोपत असतील, पण त्यांना आज असं जमिनीवर झोपावं लागत आहे. लोक म्हणतात ते खरं आहे, माणसाच्या नशिबात जे विधिलिखित असतं तसंच घडतं.

दुसर्‍या दिवशी निषादराजाने श्रीरामांचे चरण धुतले आणि त्याने स्वत: नावेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना बसवून गंगा नदी पार करून दुसर्‍या किनार्‍यावर पोहचवले. या प्रसंगामुळे या भागाला ‘रामचौरा’ असे म्हणतात. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या प्रतिमा असलेले एक लहानसे मंदिर येथे आहे. श्रृंगवेरपूर येथे दोन रस्त्यांच्या दुभाजकावर निषादराज गुहा यांची भव्य मूर्ती आहे. येथे जवळच एका बोर्डावर ‘श्रीराम वन गमन मार्ग’ तसेच त्याखाली रामसैया 3 किमी आणि श्रृंगवेरपूर असे लिहिलेले आहे.

श्रृंगवेरपूरचे आणखी एक महत्त्व सांगितले जाते. ते असे की श्रीरामाच्या जन्मापूर्वी येथे श्रृंगी नावाच्या ऋषींचा आश्रम होता. या श्रृंगी ऋषींनीच दशरथ राजाला पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टि यज्ञ करण्यास सांगितले. त्यानुसार पुत्र कामेष्टि यज्ञ केल्यावर दशरथ राजाला श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चार पुत्र प्राप्त झाले. दशरथ राजाने प्रसन्न होऊन श्रृंगी ऋषींना दक्षिणा मागण्यास सांगितले. श्रृंगी ऋषीने दशरथ राजाची कन्या पत्नी म्हणून मागितली. दशरथ राजाला श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार पुत्र होण्याआधी शांता नावाची कन्या झाली होती. ती त्याने एका मित्र राजाला दत्तक दिलेली होती. तिचे नाव शांता होते. दशरथ राजाची हीच कन्या पुढे श्रृंगी ऋषींची पत्नी झाली.

श्रृंगवेरपूर येथे गंगेच्या काठी उंच टेकडीवर गर्द लाल रंग दिलेल्या अनेक पायर्‍या असलेले भव्य मंदिर आहे. या मंदिरात श्रृंगी ऋषी, त्यांची पत्नी शांतादेवी आणि शीतला देवी यांच्या मूर्ती आहेत. येथून जवळच निषादराज गुहा यांचा उत्खननात सापडलेला किल्ला आहे. पुरातत्त्व विभागाने हे उत्खनन केले आहे. श्रृंगवेरपूर येथे एक दिवस थांबून श्रीराम, सीता आणि लक्ष्मण गंगा नदी पार करून प्रयागराज येथे गेले.

कसे जावे?

श्रृंगवेरपूर हे अलाहाबाद जिल्ह्यातील सोरावन तालुक्यातील लहानसे गाव आहे. प्रयागराजपासून लखनऊ रोडवर  45 किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -