काही महत्त्वाचं काम नेहमी विसरता का? किंवा तुमची चावी नेहमीच तुम्ही घरी विसरून बाहेर पडता का? त्यावेळी नक्कीच तुम्हाला राग येत असेल ना? बऱ्याचदा आपल्याला बरंच काही विसरण्याची सवय असते. पण यावर नक्की उपाय काय? बरेच जण बदाम खा असं सांगतात. पण तो उपाय किती अमलात आणण्यात येतो यातही शंकाच आहे. यावर आपण स्वतःच स्वतःसाठी काही उपाय करायला हवेत. जर लहान सहान गोष्टी विसरत असाल तर, असं जास्त तणाव आणि ताणामुळं होत असतं. त्यामुळं बऱ्याच कामामध्येही बाधा येते. तुम्हाला स्मरणशक्तीचा अर्थात लक्षात ठेवण्यासाठी अडचण येत असेल तर, आपल्या डाएटमध्ये काही विशिष्ट गोष्टींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. या काही गोष्टी आपल्याला नेहमीच फायदेशीर ठरतात. बदाम हा पदार्थ तर नेहमीच तुम्ही रात्री पाण्यात ठेवून सकाळी उठल्यावर खाणे फायदेशीर असतो. पण त्याशिवाय अजूनही काही पदार्थ आहेत, जे स्मरणशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतात. काय आहेत हे पदार्थ जाणून घेऊया.
१. टॉमेटो – टॉमेटोमध्ये अँडिऑक्सिडंट बऱ्याच प्रमाणात असतं. त्यामुळं रोज आपल्या सलाडमध्ये टॉमेटोचा समावेश करून घ्यावा. यामुळं स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
२. बेदाणे – बेदाण्यात विटामिन सी चं अधिक प्रमाण असतं. त्यामुळं डोकं तल्लख राहतं. रोज सकाळी १५ ते २० भिजत घातलेले बेदाणे खाल्यास, रक्ताची कमतरता निघून जाते आणि ह्रदयदेखील मजबूत होतं.
३. दुधीची बी – दुधीच्या बियांमध्ये जिंक तत्त्व जास्त प्रमाणात असतं. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. म्हणूनच स्मरणशक्तीदेखील चांगली राहण्यास दुधीची बी फायदेशीर आहे.
४. ऑलिव्ह ऑईल – जेवण बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करता येतो. शिवाय पोळीवर तूपाऐवजी ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यास, स्मरणशक्ती चांगली राखण्यास मदत होते.
दरम्यान विशेषज्ज्ञांनुसार, अति मीठ, साखर, तेलकट पदार्थ आणि फास्ट फूड यामुळं स्मरणशक्तीवर जास्त प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळं अशा तऱ्हेचे पदार्थ खाण्याचे टाळल्यासदेखील स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते. आपल्या रोजच्या खाण्यात वरील पदार्थांचा वापर केल्यास, नक्कीच स्मरणशक्ती चांगली राखण्यास मदत होईल.