मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करण्यासह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याण तालुक्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण विभागातर्फे रविवारी (ता. 07 जानेवारी) सकाळी 10 वाजता वरप येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Ajit Pawar’s cannon will be fired for the first time in Kalyan)
आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसायला सुरुवात केली असून आता महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर कल्याण तालुक्यात अजित पवार पहिल्यांदाच जाणार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. तर महायुतीला देखील या कार्यक्रमाचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण आगामी काळात होणाऱ्या लोकसभेत महायुती एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यादृष्टीने देखील ही सभा महत्त्वाची असणार आहे.
या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांच्यासह रमेश हनुमंते, भरत गंगोत्री, सोनिया धामी, किसनराव तारमाळे, प्रवीण खरात आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.