मुंबई : मुंबई महापालिका आरोग्य खात्यामार्फत गुरुवारपासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. याद्वारे २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानाचे नियोजन व अंमलबजावणी व नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पालिका स्तरावर जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले. यासंदर्भातील माहिती उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांनी दिली आहे. (Aware Parents Strong Child special campaign in Mumbai from today)
राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ९ फेब्रुवारीपासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे.
राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने सदर अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा कृती दलाची सभा घेण्यात आली. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य), कार्यकारी आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, भारतीय वैद्यकीय संघटनेचे सदस्य, इंडियन असोसिएशन ऑफ बालरोगतज्ज्ञ सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी यावेळी दिले.
या अभियानच्या अंतर्गत, शहर व उपनगर विभागातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, दिव्यांग शाळा व अंधशाळा, अंगणवाड्या, बालगृहे / बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग, वसतिगृहे (मुले/मुली), खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये, तसेच शाळाबाह्य विद्यार्थी अश्या ० ते १८ वर्षापर्यंतच्या साधारण २४ लाख मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले आहे.
शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, खासगी शाळा, अंध शाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खाजगी नर्सरी, बालवाड्या, बालगृहे, बालसुधार गृहे, अनाथ आश्रम, समाजकल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे (मुले / मुली), शाळाबाह्य (उपरोक्त दिलेल्या नजीकच्या शासकीय शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी) आदी ठिकाणी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे
अभियानाची उद्दिष्टे :
- राज्यातील १८ वर्षावरील सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे.
- सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे.
- ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची/ किशोरवयीन मुला–मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.
- आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे.
- गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया, ई.)
- प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे
- सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन करणे.
हेही वाचा – आदित्य ठाकरेंचे काम लोकांना बघवत नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला