नाशिक : सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत तथा समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके (वय ६०) यांचे बुधवारी (दि.९) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाशिकमधील साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिकांनी ‘माय महानगर’शी बोलताना त्यांच्याविषयी आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनाने अभ्यासपूर्ण चालते-बोलते विद्यापीठ गमावले असून, पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. बौद्धिक अधिष्ठान असलेले अभ्यासू विचारवंत गमावले. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्य निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रखड भूमिका घेवून आपली मते अभ्यासपूर्णरित्या मांडणारा एक ओ. बी. सी. चळवळीतील महत्वपूर्ण नेता देशाने गमावला आहे. अभ्यासपूर्ण चालते बोलते विद्यापीठ आपण गमावले आहे. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रा. हरी नरके यांनी समग्र लिखाण केले. महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन करणारे संशोधक म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्यामुळे या महाराष्ट्राला फुले समजले असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे. महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. : दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक
प्रा. हरी नरके यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे. ओबीसींवर जिथे अन्याय होत असेल तिथे त्यांनी आपल्या लेखनातून, भाषणातून वाचा फोडली. त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा समता पुरस्कार तसेच, सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अनेक शासकीय आणि देशपातळीवरील त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्था, संघटनांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, कला, सांकृतिक, सामाजिक क्षेत्राची तसेच ओबीसी आणि परिवर्तनवादी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नरके कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. : छगन भुजबळ, अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री
गेल्या आठवड्यात प्रा. हरी नरके यांच्याशी चर्चा झाली. संविधान वाचविण्यासाठी कसा लढा द्यावा, या विषयावर मुक्तसंवाद झाला. संविधानाचे रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा भेटून चर्चा करणार होतो. मात्र, प्रवासातच त्यांच्या निधनाचे वृत्त समजले. ते ऐकून वाईट वाटले. त्यांच्या निधनाने बहुजनांचा आवाज, संविधानाचे रक्षण करणारे व्यक्तीमत्व हरपले आहे. : नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचार आणि कार्याचा द्रष्टा अभ्यासक व इतर मागासवर्गीयांच्या चळवळीचा कृतीशील लढवय्या, पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे. हरी नरके हे बौद्धिक अधिष्ठान असलेले अभ्यासू विचारवंत होते. रविवारी (ता.६ ) त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रकृतीच्या चौकशीसाठी भेट घेतली होती. प्रकृती अस्वास्थ्याच्या काळातही ते उल्हसित होते. या भेटीप्रसंगी त्यांनी ‘महात्मा जोतिबा फुले : पर्यायी समाजव्यवस्थेचे शिल्पकार’ हे त्यांचे पुस्तक भेट दिले. ही हृद्यभेट शेवटचीच ठरेल, असे वाटले नव्हते. : प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
ज्येष्ठ विचारवंत, फुले शाहू आंबेडकरी विचारप्रणालीचे गाढे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचे अकाली जाणे धक्कादायक आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्याशी संपर्क झाला होता. ते मुक्त विद्यापीठात येणार होते. मात्र, बुधवारी सकाळी ही दुःखद घटना घडली. हरिभाऊ परिवर्तनाच्या चळवळीतले आघाडीचे शिलेदार होते. महात्मा फुले यांच्या समग्र जीवनकार्याचे ते व्यासंगी भाष्यकार आणि अभ्यासक होते. बहुजन समाजात प्रबोधनाचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी त्यांनी आपली सारी हयात घालवली. आपल्या सहज व सोप्या भाषेतून ते श्रोत्यांशी संवाद साधायचे. आपल्या वाणी व लेखणीने त्यांनी प्रबोधनाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यासाठी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. आरक्षण धोरणाच्या विरोधकांचा ते अतिशय मुद्देसूद आणि तर्कशुद्ध समाचार घेऊन सडेतोड मांडणी करायचे. हरिभाऊंच्या अवेळी, अकस्मात जाण्याने महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीची अपरिमित हानी झाली आहे. सामाजिक व राजकीय भवतलात त्यांचे असणे मोठा आधार होता. हा आधारवड अचानक कोसळला आहे! : प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार, संचालक, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा, मुक्त विद्यापीठ
जेष्ठ विचारवंत, लेखक महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक व्याख्याता म्हणून ते सुपरिचित होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.९४ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांच्याशी अनेकदा चर्चा करण्याची संधी मिळाली, आज महात्मा फुले यांच्यावरील भाष्यकार हरपला आहे. : जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथसचिव, सावाना
नरके सरांचे जाणे नव्या वाचकासाठी दु:खदायक आहे. तरुण पिढी व सजगतेने वाचन करत आहे. त्यांच्या वाचनात नरके सर येत होते. त्यांचे वाड्मय सामाजिक माहिती देणारे नव्हते. तर ते नव्या पिढीला दिशा देणारे होते. मूलभूत प्रश्न, इतिहास, व्यक्तीमत्व कशी बहरतात, हे त्यांच्या साहित्यातून समजत होते. : नरेश महाजन, ज्येष्ठ साहित्यिक
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा अभ्यास असणारे हरी नरके हे माझे मित्र होते. बाबा आढाव यांच्या विषमता निर्मूलन शिबिरात हरी नरके तरुण वयात सहभागी होत असत. त्यातून त्यांच्यातला समाजचिंतक व अभ्यासक निर्माण झाला. महात्मा फुले यांचे साहित्य आणि फुले यांचे टिकाकार या दोन्ही बाबी त्यांनी डोळसपणे अभ्यासले होते. ओबीसींच्या प्रश्नांची त्यांची मांडणी महत्वपूर्ण होती. सामाजिक साहित्य व चळवळीचा अभ्यासू संदर्भकोष आपल्यातून फार लवकर गेला. त्यांना भावपूर्ण आदरांजली! : प्रा. डॉ. शंकर बोर्हाडे, अध्यक्ष , मसाप, जलालपूर