गुहागर – एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडी सरकार पाडल्यापासून शिंदे गट आणि माहाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान दहीहंडी व आणि आता गणेशोत्सवातील गाठीभेटीवरून मुंबई पालिका निवडणुकासाठी समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यात कधीही जाहीर होऊ शकते. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर गंभीरा आरोप केले आहेत. यावेळी मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल, राज्यातील मुस्लिम बांधवांनी भाजपचा डाव वेळीच ओळखावा, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.
मुंबई पालिका निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भास्कर जाधव यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भास्कर जाधव यांनी गुहागर येथील एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले.
भास्कर जाधव काय म्हणाले –
मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. यावेळी ४० आमदार फोडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा नाही हे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता भाजप दोन समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करेल. काहीही करून मुस्लिम तरुणांनी डोके शांत ठेऊन भाजपचा डाव ओळखावा व मुंबई महानगरपालिकेत पुन्हा शिवसनेनेला सत्तेत आणा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी मुस्लिम समुदायाला केले
शिंदे गटातील आमदारांना आव्हान –
गुहागरमधील सभेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांना खुले आव्हान दिले. हिंमत असेल तर राजीनामा देऊन जनमताला सामोरे जा,असे भास्कर जाधव म्हणाले. यावेळी त्यांनी रामदास कदम व नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.