‘येत्या १ जानेवारीला आम्ही कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणार असून, आम्हाला कोणी रोखू शकत नाही’ असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. कोरेगाव-भीमाच्या स्तंभाजवळ कुणालाच सभा घेण्याची परवानगी देणार नाही, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसापूर्वीच म्हटलं होतं. मात्र, या विधानावर आता प्रकाश आंबेडकर यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. अहमदनगर दौऱ्यावर आलेल्या प्रकाश प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान करत अप्रत्यक्षपणे दिलीप कांबळे यांना टोला मारला आहे. आम्हाला विजय स्तंभाजवळ जाण्यापासून रोखण्याची भाषा करणारा सामाजिक न्याय राज्यमंत्री हा बिनडोक आहे, खरंतर ही राखीव जागांवरील भुंकणारी कुत्री आहेत. ही कुत्री त्यांना जे सांगितलं जाईल ते आणि तेवढेच कामं करत असतात, अशीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नाव न घेता कांबळे यांच्यावर केली. नगर दौऱ्यादरम्यान आंबेडकर यांनी पत्रकारांशी अनेक मुद्द्यांवरुन संवाद साधला आहे.
काँग्रेसने भाजप विरोधातील संवाद वाढवला पाहिजे…
नुकत्याच झालेल्या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाने, पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे आत्मे पुन्हा जागे झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने आता सर्वांशी भाजप विरोधातील संवाद वाढवला पाहिजे, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. आज देशात भाजपविरोधात वातावरण असून, निवडणुका झाल्यास भाजपला दोनशेच्या आत लोकसभेच्या जागा मिळतील, असा दावाही त्यांनी बोलतेवेळी केला. राफेल प्रकरणी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर बोलण्यापेक्षा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बोलायला लावलं पाहिजे होतं. राफेल प्रकरणात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला खोटी माहिती दिली असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.
आरक्षणाचा मुद्द्यावरुन भांडण होणार…
आगामी निवडणूकांच्या काळात मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडण होऊ शकतं, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने ओबीसी समाज अस्वस्थ आहे. मराठ्यांनी ओबीसीची आधीची २७ टक्के व आता १६ टक्के आरक्षणावर कब्जा केल्याची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवणारा गायकवाड समितीचा अहवाल जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी डॉ. आंबेडकर यांनी येवेळी व्यक्त केली.