राज्यातील काही भागांत पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट आहे. परंतु काही भागांत पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत येत्या ३१ मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे. तर बहुतांश शहरात कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात मोठा दिलासा मिळू शकतो.पण शेतकरी कुठेतरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे. राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती तयार झाली आहे. दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, ४ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. तसेच जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे. मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाच्या बैठका बोलवल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोकण आपत्ती सौम्यकरण प्रकल्पाची बैठक, मान्सून पूर्व तयारी आढावा बैठका आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहेत.