सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचा घणाघात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, असा दम भरला. यावर जोरदार प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं.
भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 14, 2021
अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं; चंद्रकांत पाटलांचा दम
चंद्रकांत पाटलांना मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात, या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.