भाजप देशाचे संविधान बदलणार असल्याचा संभ्रम काँग्रेससह काही विरोधी पक्ष सातत्याने पसरवत आहेत. परंतु, यात तथ्य नसून हा केवळ विरोधकांचा अपप्रचार आहे. देशाच्या संविधानाचा मूळ अराखडा बदलणे कुणालाही शक्य नसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या नागपुरात आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीकास्त्र सोडले.
काय म्हणाले फडणवीस
यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. मात्र, संविधानाचा मूळ आराखडा कुणीच बदलू शकत नाही. डॉ. बाबा साहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची रक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. देशात आजवर काँग्रेसने केवळ बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग केला. त्यांच्या कथनी व करणीमध्ये अंतर होते. आम्ही बोलतो कमी, काम जास्त करतो. भाजपच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा जास्त काम झाले. काँग्रेसने केवळ काही नेत्यांनाच मोठे केले. काँग्रेसला बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत.”