घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे-अजित पवारांची संमती, राणेंच्या अटकेचा प्लॅन सोमवारीच ठरला!

उद्धव ठाकरे-अजित पवारांची संमती, राणेंच्या अटकेचा प्लॅन सोमवारीच ठरला!

Subscribe

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेच्या पडद्यामागील घडामोडी आता समोर येत आहेत. राणेंच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) पोलिसांच्या संपर्कात असल्याचा व्हिडिओ समोर आला असताना आता नवी माहिती समोर येत आहे. राणेंच्या अटकेचा प्लॅन कधी झाला, त्याला हिरवा कंदील कोणी दिला याची माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांची सोमवारी रात्रीच फोनाफोनी झाली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. राणेंच्या अटकेची आखणी सोमवारी वर्षा बंगल्यावरच करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा कुठे दाखल करायचा? कोणी काय भूमिका घ्यायची याची अंमलबजावणी मंगळवारी सकाळपासून करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अंतिम संमती नंतरच राणेंवर अटकेची कारवाई करण्याचा निर्णय झाला, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

राणेंना अटक करण्यासंदर्भात सर्व माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना देण्यात आली होती. त्यांच्या परवानगी नंतरच कारवाईला सुरवात झाली, अशीही माहिती मिळाली आहे. कारण गृह विभाग राष्ट्रवादीकडे असून महत्त्वाची जबाबदारी गृह विभागाकडे होती.

नारायण राणे यांच्या कारवाई संदर्भात महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. राणेंना मुंबई पोलिसांनी अटक केली तर मुंबईत मोठा गोंधळ होऊ शकतो म्हणून नाशिक या ठिकाणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -