घरमहाराष्ट्रसंकटे कितीही येवोत, जनतेच्या भल्यासाठी काम अखंड सुरूच राहील

संकटे कितीही येवोत, जनतेच्या भल्यासाठी काम अखंड सुरूच राहील

Subscribe

महाविकास आघाडी सरकारची द्विवर्षपूर्ती

राज्यावर आलेल्या असंख्य आव्हानांना तोंड देत अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आपला सत्तेचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केला. कोरोना महामारीच्या संकटापासून ते नैसर्गिक संकट, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा आणि कारवाई तसेच तपास यंत्रणांच्या धाडी अशा अनेक आव्हानांमध्ये ठाकरे सरकारने दोन वर्षांचा काळ अत्यंत खडतरपणे पार केला. आणखी कितीही संकटे येवोेत, जनतेच्या भल्यासाठी काम अखंड सुरूच राहील, असे अभिवचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत जनतेचे आभारही मानले आहेत.

अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या पण आम्ही विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी त्यांना केंद्रबिंदू मानून आमचे काम अखंड सुरू राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेने सरकारला आपले मानून केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले आहेत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचे राज्याच्या वाटचालीतील योगदान तितकेच महत्वाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही धन्यवाद दिले.

- Advertisement -

सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटाने, नियोजनबद्ध रीतीने मुकाबला करण्यात गेला. मात्र, जगाला संकटात टाकणार्‍या या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता, आपल्या सरकारने केलेल्या कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. याकामी जे जे कोरोनाच्या लढ्यात उतरले त्या सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले. राज्यावर आलेल्या अनेक संकटांचे आघाडी सरकारने संधीत रूपांतर केले. दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधन सुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढ्यात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या आहेतच. शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यात देखील विविध रोग आणि साथीचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत, असे त्यांनी म्हटले.

शासन आणि प्रशासनात कुठेही नकारात्मकता नव्हती. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागांनी या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल, यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या. देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी निर्माण करून या क्षेत्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास आणला. तरुणांना वेगवेगळ्या कौशल्यात पारंगत करून त्यांना रोजगार मिळेल, असा कार्यक्रम आखल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बहुद्देशीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे कामही प्रगतीने पूर्ण होत आहे. राज्यात विविध शहरांना हवाई सेवेने जोडण्याचे नियोजन आहे. रस्ते , मेट्रोमार्ग यांचे इतके भक्कम आणि दर्जेदार जाळे राज्यात असणार आहे की गतिमान महाराष्ट्राची नवीन ओळख त्यातून निर्माण होईल, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी आश्वासित केले.

- Advertisement -

देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईसारख्या महानगरात कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक व इतर मार्ग यामुळे मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महानगराच्या दळणवळण इतिहासात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व करताना वनांचा विकास, वन्य जीवांचे संरक्षण, समृद्ध पर्यावरणाचा विचार यांच्याशी कुठेही तडजोड केली नाही, करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतीने तर कोविडच्या पहिल्या लाटेपासून दमदार कामगिरी करून दाखवली आहे. विकेल ते पिकेलसारखी योजना असो किंवा बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प, शेतकर्‍यांना नवे बळ देत आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन प्रत्यक्ष राबवून दाखवले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 20 हजार कोटींहून अधिक रुपयांची कर्जमाफी केली आहे. आमच्या या शेतकर्‍याने विविध नैसर्गिक आपत्तीत खूप भोगले आहे. त्यामुळेच केंद्राच्या एनडीआरएफ निकषापेक्षा नेहमीच वाढीव मदत करून प्रशासनाने त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे. अशा विविध आपत्तीत कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा असावा, असा आमचा प्रयत्न आहे, त्यावर काम सुरू आहे. प्रत्येक शेतकर्‍याकडे सौर उर्जेवरील कृषी पंप पोहचले पाहिजे यासाठी तसे जाळे विणण्याचे काम सुरू आहे. महसूल विभागाने सुद्धा सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्न त्वरित निकाली निघावेत म्हणून महाराजस्व अभियानाची व्याप्ती आणखी वाढवली असल्याचे ते म्हणाले.

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेने घेतली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. स्कॉटलंड येथील परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) पुरस्कार मिळाला. यातून पर्यावरण बदलात महाराष्ट्र किती गांभीर्याने पुढे जात आहे हे दिसते.

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणात सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ग्रामीण भागासह आता शहरांनीही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे. सर्वसामान्यांना हक्काची घरे देणे सुरू आहे. राज्यातल्या विशेषत: ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात पिण्याचे पाणी नळाने यावे, यासाठीची योजना निश्चित कालमर्यादेत राबविली जात आहे. कोविड काळात वेगवेगळ्या श्रमिक, कामगारांना केलेले अर्थसहाय असो किंवा पालक गमावलेल्या तसेच निराधार महिलांना आधार, दुर्बल आणि शोषित घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच इतर लाभ देणे असो, सरकारने अतिशय संवेदनशीलपणे मदतीचा हात पुढे केला आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत गेल्या दोन वर्षांत सुमारे साडे चौदा लाख मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि सुमारे 2600 कोटी रुपये यासाठी आपण रुग्णालयांना दिले. अगदी पोलिसांचे उदाहरण यासाठी पुरेसे आहे. आजपर्यंत एखाद्या हवालदारासाठी आपण अधिकारी होऊ, हे केवळ स्वप्नरंजनच होते. आता त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तसा निर्णय आपण घेतला. राज्याची जलसंपदा वाढविण्यासाठी आपण आता नियोजनबद्ध रीतीने प्रकल्पांची उभारणी करतो आहोत.

आपला महान इतिहास आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी गड किल्ले संवर्धन किंवा प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार अशा बाबतीतही राज्य शासन गंभीरपणे पवले टाकत आहे. सरलेल्या दोन वर्षांत आपलेपणाची नाती रूजली, जसे काम केले तसेच पुढेही होत राहावे आणि आपला विश्वास अधिकाधिक मिळावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -