घरमहाराष्ट्र‘आधार’च्या नावावर जमिनीचे गैरव्यवहार !

‘आधार’च्या नावावर जमिनीचे गैरव्यवहार !

Subscribe

पोलिसांकडून टोळी जेरबंद

आधार कार्डामधील नाव आणि पत्त्यात बदल करून जमिनीचे गैरव्यवहार करणार्‍या टोळीतील ७ जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. यात एका माहिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड बनविणारी यंत्रसामुग्री व 10 लाख 50 हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यावेळी उपस्थित होते.

रोहे तालुक्यातील सुशील भरतु याची मौजे चांडगाव येथे, तर ओमप्रकाश वसिष्ठ यांची मौजे शेडसई येथे प्रत्येकी साडेसहा एकर जागा आहे. भरतु यांचे 2010 मध्ये निधन झाले. ओमप्रकाश वसिष्ठ हे दिल्ली येथे राहतात. गेली अनेक वर्षे ते रोह्यात आले नाहीत. भरतु हयात नसल्याचा व वसिष्ठ दिल्लीत असल्याचा गैरफायदा आरोपींनी घेऊन त्यांच्या जमिनी परस्पर विकण्याचा कट रचला. भरतु व वसिष्ठ यांची माहिती घेऊन त्यांच्या जागेचे सातबारा व इतर महसुली उतारे काढून घेण्यात आले. त्यानंतर दोघांच्या नावाने बोगस व्यक्ती तयार केल्या. गुन्ह्यातील आरोपींनी महा ई सेवा केंद्रात जाऊन मूळ मालकाचा मूळ आधार क्रमांक व बायोमेट्रिक आयडेंटिटी न बदलता त्यावरील नावे, राहण्याचा पत्ता व इतर माहितीमध्ये बदल केला. मूळ मालकांचे आधारकार्ड व पॅनकार्ड बोगस व्यक्तींच्या नावाने तयार करून खरेदीदाराबरोबर रितसर व्यवहार केला. आरोपींनी मूळ मालकाच्या नावाने बनावट युनायटेड बँक ऑफ इंडिया (वर्सोवा शाखा, मुंबई) व आयडीबीआय बँक (रामनगर शाखा, डोंबिवली) येथे खाते उघडून त्याद्वारे 28 लाखांची रोख रक्कम काढून घेतली.

- Advertisement -

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जमिनीचा व्यवहार करणार्‍यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करून घनःश्याम रमेश उपाध्याय (रा. मानपाडा, डोंबिवली), संदीप जगन लोगले (रा. पाली, कर्जत) या दोन आरोपींसह महा ई सेवा केंद्रातील दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक संगणक, एक लॅपटॉप, एक कलर प्रिंटर, तसेच बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री व बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड व 10 लाख 50 हजाराची रोकड जप्त केली आहे.

आधार कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करण्याची सुविधा शासनाने दिली आहे. याचा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती गैरवापर करीत आहेत. त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना मूळ मालक, जमिनीचे कागदपत्रे, सर्च रिपोर्ट पाहून, स्थानिकांशी चर्चा करूनच व्यवहार करावेत.
-अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -